21/01/2025
"तळकोकणातला दशावतार"
दशावतार ही मुख्यतः आमच्या तळकोकणातल्या (सिंधुदुर्ग जिल्हा) मातीत सहाशे वर्षांपुर्वी प्रसिद्धीस आलेली नाट्यकला, जी आज 150+ वर्षांपूर्वीच्या संगीत नाटकाप्रमाणेच खूप प्रसिद्धीस आलेली होती. खरेतर, दशावतार नाट्यकला हीच संगीत नाटकांची जननी आहे कारण संगीत नाटकातले संगीत, गाणे- जे रागधारीवर आधारलेले असायचे, कथानक, नाटयाभिनय ह्या सर्व गोष्टी दशावतारात होत्या पण त्या तितक्या सकस नव्हत्या.
मुळात हिंदू धर्माच्या संरक्षणकर्त्या श्रीविष्णूंच्या दहा अवतारांची कथा घेतच ही कला विकसीत झाली, जी कोकणातील प्रत्येक ग्रामदेवतेच्या उत्सवात मिरवली जाण्याची रीत पडली. पुर्वीच्या काळात तर दशावताराच्या स्पर्धाही होत असत व अगदी कथानक, गाणे, अभिनय व पात्र रंगोटी यांनाही पारितोषिके मिळत असत पण आज ही कला सादर करू शकणारे कलाकारच मर्यादित झाल्याने ही कला लोप पावेल की काय, ही भीती संगीत नाटकाप्रमाणेच निर्माण झाली आहे.
ज्याप्रमाणे संगीत नाटकातील पदे गाण्याचे मुरब्बी कलाकार असुनही ती ऐकण्यास आजच्या वेगवान नेटकरी 'जनरेशन झी' मधे समाज माध्यमाच्या युगामुळे वेळ व संयम 'न राहिल्याने' जसे अस्तास जाताना दिसत आहे, तसेच काहीतरी या दशावताराचे जुन्या स्वरूपाचे तसे काहीसे होईल, अशी भिती निर्माण झाली आहे. आज तो परदेशी 'कोल्ड-प्ले' चा बॅन्ड पाहायला रांगा व लाखो रूपये फेकले जातात पण आपल्या मातीतल्या कलेचे महत्व आपल्यालाच राहिलेले नाही, असे नाराजीने म्हणावेसे वाटते. अर्थात, त्याची काही कारणेही आहेत.
1. आज ग्रामदेवाच्या जत्रेतही लोक रात्री उशीरापर्यंत थांबण्यास खूप टाळाटाळ करतात. दशावतारी खेळ साधारणपणे पालखी उत्सव संपल्यावर (दहानंतरच) सुरू होतो व तो किमान चार-पाच तास चालतो. यातील कथा पुराणातल्या, रामायण किंवा महाभारतातल्याच ठेवल्या जातात ज्या अनेकवेळेस रटाळ व त्याच-त्याच प्रकारच्या माहित असलेल्या दाखवल्या जातात.
2. त्यात संगीत नाटकाप्रमाणेच स्त्री पार्टच पुरूषच करतो पण हल्ली हे सुध्दा बदललेले आहे. आज मुली तसेच स्त्री-वर्ग यात आनंदाने सहभागी होताना दिसत असुनही या नाट्यकलेची दुरावस्था काही संपताना दिसत नाही.
3. वास्तविक दशावतार व संगीत नाटक हया दोन्ही गोष्टी जर फक्त दोन अंकी (दोन-अडीच तासाच्या मर्यादेतच) ठेवल्या तसेच त्या सध्याच्या सामाजिक प्रश्नावरच आधारलेल्या पण पौराणिक कथांमधून व्यक्त होणाऱ्या असल्या तर ते निश्चित आजच्या प्रेक्षकांना आवडेल व पटेल. त्यात असे काळानुरूप बदल करणे, खूपच आवश्यक आहे ज्यामुळे त्यांचा व आजच्या समाज मनाचा सांधा जुळून येऊ शकेल. दोन दिवसांपूर्वी असेच एक दशावतारी नाटक पार्ल्याच्या "लोकमान्य सेवा संघात" सादर झाले.
4. प्रेक्षकांना आवडण्यासाठी जर त्या दशावतारी नाटकातील गोष्ट त्यांच्या आयुष्याशी निगडित अशी असेल, तर मग त्याला लगेच प्रतिसादही मिळू लागतो, हे मी तेव्हा प्रत्यक्षच पाहिले. अशी दशावतारी नाटके मग व्यावसायिक रंगभूमीवरही येऊ शकतील. अनेकवेळा गावातील दशावतारी संच त्यांचे तयार असलेले जुनेच कथानक, निरस गाण्यांचे नाट्यच सादर करण्यात धन्यता मानतात व मग त्यात प्रेक्षकांचा हिरमोड होतो. त्यामुळे विषयाची निवड, ही दशावतार कलेला पुढे नेण्यास खूपच उपयोगी पडेल असे मला राहून राहून वाटून गेले. प्रेक्षक त्या पौराणिक विषयात रममाण होणे व आता पुढे काय होईल,याची उत्कंठा त्याला लागेल,असे सादरीकरणही, अभिनय, पात्र व सर्वात महत्वाचा विषय त्यात असणे, हे दशावतारी नाट्यप्रकार यशस्वी होण्यास मदत करेल.
काही वर्षांपुर्वी कोकणातले प्रसिद्ध नाट्यकर्मी श्री. मच्छिंद्र कांबळी यांनी 'वस्त्रहरण' हे नाटक "दशावतारा"त बुडवून अत्यंत खुबीने मालवणी भाषेचा तडका देत, अत्यंत आकर्षक कथेत गुंडाळत अचानकच व्यावसायिक रंगभूमीवर आणले व ते इतके गाजले की, त्याचे अक्षरशः वेगवेगळ्या संचात शेकडो प्रयोग आजही होत आहेत. त्यात तात्या सरपंचाची भुमिका स्वतः मच्छिंद्र कांबळीच करत. आज प्रसाद कांबळी (मच्छिंद्र कांबळी यांचे सुपुत्र) याच 'वस्त्रहरण"चे प्रयोग करतात व त्यांचा प्रत्येक प्रयोग हा हाऊसफुलच जातो. मच्छिंद्र कांबळींसारखे प्रयोग करणारे साहित्य,कथानक आणि ती युक्ती वापरली जाणे आज ही नाटयकला टिकवण्यासाठी खूप महत्त्वाचे आहे.
लोकमान्य सेवा संघात काल सादर झालेला प्रयोग ही एक शनीदेवांची गोष्ट होती ज्यात लक्ष्मी, शनीदेव व त्याने लोकांना छळण्यासाठी (स्वतःचे महत्व पटवण्यासाठी) निर्माण केलेला 'महाकाल' असे कथेत होते. त्याचे सादरीकरण इतके उत्कंठावर्धक होते की दोन तासात प्रेक्षकांना शनीदेवाची गोष्ट, शनीचा कोप (त्याला मुळातच राग का/केव्हा येतो व त्यावरचा उपाय वगैरे) गोष्टी अगदी सहजपणे सांगून लोकांच्या "टाळ्यांचा गडगडाटच" निर्मात्याने मिळवला. या दशावतारी नाट्याचे नाव होते "शनैश्वरम" जे "क्रेसेंट थिएटर, मुंबई" यांनी प्रदर्शित केले होते. इतका आकर्षक, नेटका, नेमका व व्यवस्थित प्रयोग दृष्ट काढण्यासारखा झाला होता नाटकातील नटमंडळी हौशी व ध्येयवादी दिसली जो हा "दशावतार" प्रकार पुढे नेण्यास उत्सुक दिसली. निर्मात्याने हे असे आगळे व वेगवेगळे दशावतारी प्रयोग कुठल्याही समारंभासाठी अगदी स्वस्तात सादर करायची तयारी आहे, हे जाहीर केले. त्यांनी अगदी कमी साधने, कमी कलाकारांमधे पण अगदी शिस्तीत हा प्रयोग सादर करून लोकांना खरेतर आश्चर्यचकितच केले होते. हल्ली जरी नवी पिढी पत्रिका व मंगळ/शनी या गोष्टींवर तसा विश्वास दाखवत नसली तरीही त्याबाबत बराच अंधविश्वास समाजात सुरू असतो पण मुळात शनी-प्रकोप का होतो, हे अगदी सहजपणे दाखवत या दशावतारी नाट्य निर्मात्याने खरेतर एक मोठे समाज प्रबोधनही केलेले दिसले व ते ही समाजातले महिलांवरील अत्याचारावरही भाष्य करत दाखवल्याने नाटक जमून गेले होते.
आपल्यापैकी कोणीही कोकणप्रेमी जर "दशावतार" या नाटय-प्रकाराला पुढे नेण्यास उत्सुक असतील तर त्यांनी या संचाचा एक प्रयोग आपल्या समारंभात जरूर ठेवावा, म्हणजे यांची जादू आपल्याला कळू शकेल, हे ही त्या निर्मात्याने जाहीरही करून टाकले व प्रेक्षकांना एक वेगळेच आव्हान दिले.
2019ला 'बेहेरे परिवार संमेलनात' आमच्या गावी आम्ही (आजगाव/आरवली) येथे असाच एक दशावतारी प्रयोग (आजगावच्या नटमंडळींनीच बसवलेला) आयोजित केला होता. त्यावेळेस आनंदाने बिदागी देताना खरेच खूप कृतकृत्य सर्वांनाच वाटले होते. काल तोच आनंद "क्रेसेंट थिएटर " या संस्थेची कार्यतप्तरता बघून मला झाला.
वाचकांनी याचा जरूर विचार करावा व "दशावतार" या अत्यंत जुन्या पण कोकणी मातीतून जन्मलेल्या या कलेला जिवंत ठेवण्यास हातभार लावावा, हीच कळकळीची विनंती/मागणी व तसे मी येथे आवाहनही करतो आहे.
लोकमान्य सेवा संघात झालेल्या त्या प्रयोगाचे काही फोटो टाकत आहे, ते जरूर पाहावेत. क्रेसेंट थिएटर च्या संतोष सरांचे संपर्क मोबाईल नंबर आहेत-
7039000590/9833689774
आभार.
वासुदेव पुरूषोत्तम बेहेरे
98205 38310
Chitra Pinge Wagh Lokmanya Seva Sangh, Parle