05/05/2026
*परीक्षण मा. मनिषा पाटील रायजादे मिरज*
*कविता संग्रह गजनीती*
*कवी गजानन पाटील अलकूड एम ता. कवठेमहांकाळ*
श्री गजानन पाटील यांचा गजनीती हा पहिलाच कवितासंग्रह वाचण्यात आला समृद्ध जीवनानुभव असल्यास आयुष्यातील असंख्य घडामोडी काव्यात्म रूप घेतात आणि लेखणीतून पाझरू लागतात. हे झरे अविरतपणे वाहत असतात. सर्वोत्कृष्ट भावनांचा आविष्कार कवितेच्या प्रत्येक ओळीतून दिसून येतो.जो समाजाकडे तटस्थ वृत्तीने पाहू शकतो आणि आपले भावविश्व ,समाज मनाचा आरसा आपल्या काव्यातून मांडत असतो. अशाच कविता गजानन पाटील यांच्या आहेत. त्यांच्या प्रत्येक कवितेमध्ये वैविध्य आहे. त्यांची कविता ही सर्वस्वी त्यांचीच आहे कारण त्यांच्या कवितांवर अन्य कोणाचाही प्रभाव नाही.
कवी,अभिनेता गजानन पाटील एक हाडाचे शिक्षक असून शिक्षकी पेशातून समाजात नानाविध व्यक्तीमत्वाचे पैलू घेऊन ते काव्यातून समाजपरिवर्तन करण्याचा प्रयत्न करीत आहेत.त्यांनी आपल्या प्रत्येक कवितेतून भावभावनांच्या प्रगटीकरणाबरोबर सत्याचा कैवार घेतला आहे. या कवितासंग्रहाच्या मुखपृष्ठावरील चित्रातील प्रतिकात्मक मंदिर हे ज्ञानाचे मंदिर आहे आणि ते प्राप्त करून घेण्यासाठी जंगलरूपी संकटे आपल्याला मार्गक्रमण करीत जावे लागणार आहे. मुखपृष्ठावरील चित्र हे त्याचेच द्योतक आहे. त्यांच्या या कवितासंग्रहात प्रेम, नाती, निसर्ग, परमेश्वराशी असणारे एकात्म, सण,उत्सव, ह्रदयात खोल जपलेली नाती,शेतकरी, थोर महात्मे अशा अनेक विषयांवरील अनेक कविता त्यांनी आपल्या शब्दलेखनीतून मांडल्या आहेत. त्यांनी कवितेचे अनेक प्रकार आपल्या या कवितासंग्रहातून हाताळले आहेत. प्रार्थना,ओवी,अभंग, वृत्तबद्ध कविता, काव्यांजली, हायकू, अष्टाक्षरी, द्रोण काव्यरचना, बडबडगीत,छत्तीस गुणी,गुणमेलनी,गवळण अशा अनेक काव्यप्रकारांतून त्यांनी समाजमनाशी आपल्या कवितेतून संवाद साधला आहे.आजपर्यंत कवी, अभिनेता गजानन पाटील यांनी जे पाहिले,अनुभवले ते सर्व आपल्या शब्दरूपातून रसिक वाचकांपर्यंत पोहचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे.
कवी, अभिनेता गजानन पाटील यांनी पवित्र ज्ञानदानाचे कार्य करता करता आपले अनेक छंद त्यांनी ह्रदयापासून जपले आहेत. काव्यलेखन, कथालेखन, गीतकार, टी.व्ही.,चित्रपट कलाकार, शालेय नाटीका व पथनाट्य लेखन व दिग्दर्शन केले आहे. त्यांनी टीव्हीवरील अनेक मालिकांमधून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. त्यांनी पौराणिक नाटक, अनेक चित्रपट यामध्ये नाना प्रकारच्या व्यक्तीरेखा अतिशय सुंदरपणे रेखाटल्या आहेत.
या कवितासंग्रहातील कविता खऱ्या अर्थाने जर समजून घ्यायच्या असतील तर त्यांच्या कवितासंग्रहातील कवितांचे थोडक्यात परीक्षण पाहूया...
त्यांची पहिलीच कविता परमेश्वराची प्रार्थना आहे.
गुरूवर्य दिगंबरा स्वीकार नमस्कार
गणराया घडू दे सर्व मंगलमय जीवन
अशी आळवणी त्यांनी परमेश्वराकडे केली आहे.
मैत्री, आई, विद्यार्थी, वहिनी, मायमाऊली कुंकू, बाबांचा श्वास, अर्धांगिनी, प्रेमस्वरूप आई,शेतकरी राजा, मायलेकी, आईपण अशा विविध नात्यांवर अतिशय मनाचा ठाव घेणाऱ्या कविता लिहिल्या आहेत....
ते आपल्या मैत्री या कवितेत म्हणतात की,
"नाही स्वार्थच मनात
करता करीन मैत्रीत
जीव जीवाला देईन
जेव्हा मित्र संकटात"
मैत्रीचे जीवनातील असणारे अनन्यसाधारण महत्व त्यांनी या ओळीतून व्यक्त केले आहे. तर आई या कवितेत,
दिपस्तंभाप्रमाणे जळत
प्रत्येक जहाजाला
मार्गदर्शन करीत
जळते तू
आईपण या कवितेत,
शिकून मोठा हो शहाणा
होशील अधिकारी
गरिबीचे दिवस संपतील
डोईवरील भार संपेल तेव्हातरी
असे आईचे आर्तमय वर्णन कविने आपल्या कवितेत केलं आहे.
कवी गजानन पाटील यांनी अनेक थोर महात्मे, संत,परमेश्वराशी असणारे त्यांचं अध्यात्मिक नातं यावर सुंदर कविता लिहिल्या आहेत. त्यांनी महात्मा जोतीराव फुले, शिवाजी महाराज, संभाजी राजे, कुसुमाग्रज, स्वामी समर्थ, पंढरीची वारी, कान्हा, देवीची रुपे अशा विविध विषयांवरही समर्पक कविता लिहिल्या आहेत.
निसर्ग तर प्रत्येक कवी लेखनीला मोहिनी घालतच असतो.तर अशाच निसर्ग शब्दांनी सजलेल्या अनेक कविता यख कवितासंग्रहात वाचायला मिळतात. ते धरतीची माया या कवितेत म्हणतात,
करी प्रेमाचा वर्षाव
धरत्रीची ती माया
काळ्या काळ्या रानामधुनी
कसं पिकतं रे मोती
तर पाऊस या कवितेत ते म्हणतात की,
पावसात भिजल्यावर
मजाच असते न्यारी
सर्वत्र हिरवेगार होई
मनमोहक पालवी भारी
एकीकडे कवीचे मन निसर्गसानिध्यात रममाण होते तर दुसरीकडे निसर्ग या अभंगात म्हणतात,
कराल हातच
निसर्गावरच
तुज कोपलेच
श्वास घेण्या
अशी आताची वास्तव परिस्थिती त्यांनी आपल्या कवितांतून मांडली आहे.
कवी गजानन पाटील हे शिक्षक असल्याने शिक्षकमन विद्यार्थी, त्यांचे भवितव्य, त्यांचे प्रश्न, त्यांच्या समस्या त्यांनी अनेक कवितेतून त्यांनी मांडले आहेत. ते आपल्या ओझे या कवितेत म्हणतात की,
पाठीवर हवे
दप्तराचे ओझे
काय माझा गुन्हा
डोक्यावर विटांचे ओझे
अशी विद्यार्थी मनाची अवस्था त्यांनी अतिशय मार्मिकपणे मांडली आहे.
कोरोना या विषाणूने सारं मानवी जीवनच हादरवून सोडलं होतं.तर या कोरोना काळात माणसाला भोगाव्या लागलेल्या यातना, त्यावेळची परिस्थिती, त्यामुळे मानवी जीवनावर झालेला परिणाम त्यांच्या अनेक कवितेतून त्यांनी समर्पकपणे मांडले आहेत ते आपल्या "सर्व काही भुकेसाठी" या कवितेत म्हणतात की,
ओला दुष्काळ, कोरडा दुष्काळ
कायमच आमच्या साथीला
नवीन रोग आलाय म्हणे
कोरोना आमच्या नशिबाला
कवी गजानन पाटील यांनी विनोदी कविता, समाजप्रबोधनात्मक कविता, अंधश्रद्धा, खेळ, व्यायाम, पुस्तटावरही अनेक कविता लिहिल्या आहेत.गवळण,अभंग हे काव्यप्रकार ही अतिशय सोप्या पध्दतीने हाताळले आहेत. ते आपल्या "कान्हा"या गवळणीत म्हणतात की,
वसुदेव घेई हो टोपलीत
कान्हाचा जन्म हो बंदीवासात
पंढरीची वारी या अभंगात म्हणतात की,
वारी वारी पंढरीची
रखुमाई विठ्ठलाची
पायीच चालणाऱ्यांची
भेटी आस विठ्ठलाची
अशा नानाविध विषयांनी, आशयांनी सजलेला गजनीती हा कवितासंग्रह अतिशय वाचनीय आहे. प्रत्येक कविता वाचत असताना जीवनातील विविध पैलूंचे दर्शन त्यांच्या कवितेतून होते. हा पहिलाच कवितासंग्रह वैविध्याने नटलेला आहे. कवी शिक्षक मनाला स्पर्श करणारा आहे. या कवितासंग्रहातील कविता निसर्ग, मानवी मूल्ये, मानवी जीवन, ग्रामीण संस्कृती, अध्यात्म, ह्रदयाशी जोडलेली अनेक नातीगोती यांच्याशी निगडित असल्यामुळे खऱ्या अर्थाने रसिक वाचक मनाला आपल्याशा नक्कीच वाटतील. कवी गजानन पाटील यांची प्रगल्भता, प्रतिभा या कवितासंग्रहातून पहायला मिळते.
रसिक वाचक कवी गजानन पाटील यांच्या"गजनीती"या कवितासंग्रहाचे नक्कीच स्वागत करतील. असा मला विश्वास आहे. या कवितासंग्रहात एकूण ८६ कविता आहेत. त्यांना माझ्याकडून खूप खूप हार्दीक हार्दीक शुभेच्छा आहेत. आणि पुढील काव्य वाटचालीसाठी अनेक अनेक शुभेच्छा.
गजनीती(काव्यसंग्रह)
कवी, लेखक, टी.व्ही-चित्रपट कलाकार मा.गजानन पाटील.
तेजश्री प्रकाशन, मूल्य रू.२५१/-