19/02/2021
शिवजयंती कशी साजरी करावी
खेळ खेळणे
मर्दानी खेळांमुळे लढाऊवृत्ती निर्माण होणे : शिवराय पटांगणात खेळ खेळत. कुस्ती, दांडपट्टा, घोड्यावर स्वार होणे, तलवार चालवणे अशा खेळांमुळे त्यांच्यात निर्भयता, क्षात्रवृत्ती, अन्यायाविरुद्ध चीड, लढाऊवृत्ती, तसेच नेतृत्वगुण असे अनेक गुण निर्माण झाले.
मित्रांनो, गुणच आपल्या जीवनाचा पाया आहे; म्हणून आपण प्रत्यक्ष मर्दानी खेळ खेळलो, तरच आपल्यात गुण येतील.
काल्पनिक खेळांमुळे विध्वंसकतेकडे वाटचाल होत असल्याने त्यांवर बहिष्कार टाकणे आवश्यक : सध्या मुले संगणकावर काल्पनिक खेळ खेळतात. ते खेळ विध्वंसक आणि विकृत विचार निर्माण करणारे असतात, उदा. विकृत पद्धतीने गाडी चालवणे, कुणालाही बंदुकीने मारणे, एकमेकांना मारणे इत्यादी.
मित्रांनो, अशा खेळांतून मुले मनाने दुर्बळ होऊन विकृत होतात. हे खेळ काल्पनिक असल्याने मुले वास्तवात न जगता कल्पनेच्या विश्वात वावरतात आणि त्यामुळे मुलांना वास्तव जीवन जगणे कठीण जाते. ती आत्मकेंद्रित बनल्याने ‘मला या राष्ट्रासाठी जगायचे आहे’, हा व्यापक विचार त्यांच्या मनात येत नाही. अशा मुलांमध्ये राष्ट्रप्रेमच निर्माण होत नसल्याने ती मुले राष्ट्राचे रक्षण करतील का ? मित्रांनो, आता तुम्हीच सांगा की, आपल्याला संगणकावरील खेळ खेळून विकृत व्हायचे कि छत्रपती शिवरायांसारखे क्षात्रवृत्ती जागृत करून राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी सिद्ध व्हायचे ? आता आपण निश्चय करूया की, संगणकावरील खेळांवर बहिष्कार टाकायचा आणि प्रत्यक्ष खेळ खेळायचा. हीच खरी शिवजयंती आहे. मग कराल ना ?
गोष्टी वाचणे आणि ऐकणे
उत्तम संस्कार करून घेणे : शिवराय नेहमी राम–कृष्ण यांच्या गोष्टी वाचत आणि ऐकत. प्रत्यक्ष घडलेल्या आणि ज्यांमधून देवभक्ती, राष्ट्रप्रेम अन् अन्यायाविरुद्ध चीड निर्माण होईल, अशा गोष्टींचे वाचन केल्यामुळे त्यांच्यातील राष्ट्रप्रेम जागृत झाले. त्यांनी अन्यायी मोगलांना पायबंद घातला.
काल्पनिक आणि खोट्या गोष्टींमुळे विकृती बळावणे : सध्या मुले ‘टॉम अँड जेरी’ यांसारख्या काल्पनिक आणि खोट्या गोष्टी वाचतात अन् ऐकतात. त्यामुळे मुले कल्पनेच्या जगतात वावरतात. त्यांच्यात राष्ट्रप्रेम आणि राष्ट्राभिमान असे गुण निर्माण होत नाहीत. पर्यायाने ती मनाने दुर्बळ होतात.
मुलांनो, मला सांगा की, आपल्याला रामायण, महाभारत यांमधील वास्तव गोष्टी समजून घेऊन शिवरायांसारखे राष्ट्रप्रेमी व्हायला आवडेल कि ‘टॉम अँड जेरी’सारख्या काल्पनिक गोष्टी पाहून मनाने दुर्बळ व्हायला आवडेल ? शिवरायांना सांगूया की, आम्हाला आपल्यासारखे होऊन आदर्श राज्य घडवायचे आहे, यासाठी आम्ही आजपासून वास्तव गोष्टी ऐकू आणि वाचू.
आई-वडिलांना नमस्कार करणे
उद्धटपणा टाळून विनम्रता जोपासणे : शिवाजी महाराज प्रतिदिन आईला नतमस्तक होऊन नमस्कार करत. त्यामुळे त्यांच्यात ‘विनम्रता’ हा गुण आपोआपच आला. जिथे नम्रता असते, तिथेच सरस्वती वास करते; म्हणून त्यांनी अनेक कला आत्मसात केल्या होत्या.
आपल्याला शिवरायांसारखे व्हायचे असेल, तर आपण प्रतिदिन आपल्या आई-वडिलांना नमस्कार करायला हवा. सध्या काही मुले आपल्या आईशी उद्धटपणे बोलतात. त्यामुळे आपल्यात विनम्रता कशी येणार ? आपण शिवरायांना सांगायला हवे, ‘महाराज, आपले गुण आम्ही विसरलो. आम्हाला क्षमा करा. आम्ही आजपासून प्रतिदिन आईला नमस्कार करू आणि आमच्यात ‘नम्रता’ हा गुण आणू.’ मित्रांनो, असे कराल ना ? असे करणे हीच खरी शिवजयंती आहे.
योग्य आदर्श ठरवणे
राम-कृष्ण यांचा आदर्श ठेवणे : शिवरायांचे आदर्श होते, राम आणि कृष्ण. मुलांचे जसे आदर्श असतात, तशी मुले घडतात. आपले आदर्श चांगले असतील, तर आपणसुद्धा तसेच घडू. आपल्या जीवनाचा योग्य आदर्श ठरवणे फार महत्त्वाचे आहे.
चित्रपटातील नायकांचा आदर्श ठेवणे सर्वथा अयोग्य : सध्या चित्रपटातील एखादा नायक, उदा. सलमान, शाहरुख, तसेच ब्रुस ली, रॉक असे मुलांचे आदर्श असतात. मित्रांनो, आदर्शाप्रमाणे ती व्यक्ती घडत असते. वरील आदर्शांमध्ये कोणता गुण आहे की, जो राष्ट्र आणि समाज यांना हितकर आहे ? मित्रांनो, हे पडद्यावर खोटे नाटक करतात; पण त्यांचे वास्तवातील वर्तन आदर्श नसते.
आपण आपला आदर्श असा ठरवावा की, ज्याच्यात सर्व गुण आहेत. जो जसा बोलतो, तसा वागतो. मित्रांनो, शिवाजी महाराज असेच होते; म्हणून त्यांनाच आपला आदर्श म्हणून मानूया.