15/02/2025
छावा
जवळपास ४-५ सिनेमा हॅाल्स पूर्ण booked आहे पाहिल्यावर पुढची तिकीट्स पदरी पडली, पण तरीही छावा पहायचं वेड होतचं, रात्री ११ः३५ चा show.
हे वेड सिनेमाचं नाही ‘छाव्या’साठी चं आहे!
स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांच हे वेडं आहे!
मराठी राजाचं कतृत्त्व जगभर दाखवण्यासाठी, त्याची किर्ती अमराठी लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी ‘छावा’ हा सिनेमा नक्कीच काम करेल.
पण…मराठी इतिहास ज्यांना माहिती आहे, संभाजी महाराजांची निर्भिडता, त्यांच साहस, पराक्रम, आक्रमकता, विविध भाषांवरच प्रभुत्व, वक्तृत्व ज्यांना माहिती आहे त्यांची थोडी फार निराशा होऊ शकते…माझी तरी झाली..
मुळात सुरवातच होते ती कोणाती धर्म आम्ही मानत नाही पासून…कशासाठी? हिंदूच्या कट्टर राजाचं चरित्र दाखवताना हिंदू धर्माबद्दल अभिमान व्यक्त करताना कसली भिती??
संभाजी महराजांनी अभेद्य जंजीऱ्या ला वेढा घालून सिद्दी च्या नाकी नऊ आणले होते, त्याकाळी कमी वेळात समुद्रात रस्ता बांधण्याची असाध्य गोष्ट त्यांनी केली होती त्याचा उल्लेख ही सिनेमात नाही…जवळपास १२० लढाया लढून आणि सगळ्यात यशस्वी होणाऱ्या या पराक्रमी छाव्याला केवळ बुऱ्हाणपूर ची लूट दाखवून सिमीत केलं आहे.
मध्यांतरानंतर सगळ्या लढाया उरकल्या आहेत, राजांबरोबर कुठल्या प्रांतांत कोण स्वराज्याचे रक्षण करणारे मावळे होते याचा स्पष्ट उल्लेख ही नाही..त्यांचाही पराक्रम तेवढाच महत्वाचा आहे.
संवादांसाठी उत्तम वाव असताना ही फारशी मेहनत दिसत नाही. अगदी छावा या शिवाजी सावंत यांच्या पुस्तकातून हिंदी भाषांतर केलं असतं तरी प्रभावित करणारे संवाद होऊ शकले असते.
रेहमान असूनही संगीत छाप सोडत नाही…मराठी बाजच मुळात संगीतात सापडत नाही…आया के तूफान चं संगीत ही मराठी पेक्षा अलीकडच्या काळातल्या एखाद्या athlete ला शोभेल असं वाटतं…एकही music masterpiece टाकता आला नाही..कदाचित इथे अजय अतुल असते तर काहीतरी वेगळं ऐकायला मिळालं असतं जे मराठी मातीतलं असतं.
विकी कौशल ने मेहनत घेतली आहे तरीही दिग्दर्शन अत्यंत कमकुवत वाटलं त्यामुळे फक्त शेवटचा प्रसंग सोडता महराजांची छबी म्हणून विकी कौशल लक्षात राहिल असं फारसं घडलं नाही. रश्मिका मंदाना त्यामानाने उजवी वाटली.
शेवटच्या प्रसंगाला सामोरं जाताना डोळे घळाघळा वहातात..जखमा पुन्हा ताज्या होतात..
मराठी सिनेमा धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज हपाहिल्यावर छावा कुठेतरी कमी पडला आहे असं जाणवत रहातं…पण अर्थात हा माझा मराठी माणूस म्हणून अपेक्षा असलेला दृष्टीकोन आहे…
ज्यांना निधडा छावा माहितच नाही अशांपर्यंत पोहचण्यासाठी हे उत्तम माध्यम आहे. तुम्हीही एकदा जरूर बघू शकता! पुष्पा, KGF ला हिरो न बनवता छाव्या ला आपण आपला आदर्श बनवूच शकतो!
माती तुळापुरची झाली, पावन तुझ्या रक्ताने,
ते साखळदंड झाले, धन्य तुझ्या स्पर्शाने,
पाहुनी शौर्य तुजं पुढे, मृत्युही नतमस्तक झाला
स्वराज्याच्या मातीसाठी, माझा शंभूराजा अमर झाला
छत्रपती संभाजी महाराजांना त्रिवार मुजरा !!
समिरा