06/06/2026
एक काळ होता, जेव्हा काजवे आमच्या बालपणातील मित्र होते. पावसाळ्याच्या उंबरठ्यावर ते गावाकडच्या पायवाटा, भातशेतीची बांधं, आंबा-काजूच्या बागा आणि रानावनात चमकू लागले की संपूर्ण परिसर जणू आकाशातील ताऱ्यांनी जमिनीवर उतरल्यासारखा भासायचा. त्या प्रकाशात आनंद होता, कुतूहल होते आणि निसर्गाशी एक निस्सीम नाते होते. काजवे पाहण्यासाठी कुठे जाण्याची गरज नव्हती; ते आपल्या जीवनाचा आणि परिसराचा सहज भाग होते. आज त्याच काजव्यांना ‘महोत्सवा’च्या चौकटीत बंदिस्त केले जाताना पाहिले की प्रश्न पडतो...आपण निसर्ग अनुभवतोय की त्याचे व्यापारीकरण साजरे करतोय?
पावसाआधीच्या दिवसांत काजवे दिसणे ही काही दुर्मिळ किंवा कृत्रिमरित्या निर्माण केलेली घटना नाही. शेकडो वर्षांपासून ते जंगलात, डोंगरकपारीत, शेतांच्या कडेला आणि गावांच्या परिसरात त्यांच्या नैसर्गिक जीवनचक्रानुसार चमकत आले आहेत. मुळात हा त्यांचा प्रजननाचा काळ असतो. वर्षातील अनेक महिने काजव्यांच्या अळ्या ओलसर माती, पालापाचोळा आणि जमिनीखालील सुरक्षित वातावरणात वाढत असतात. पावसापूर्वीच्या विशिष्ट हवामानात प्रौढ काजवे बाहेर येतात आणि आपल्या प्रकाशाच्या संकेतांद्वारे जोडीदार शोधतात. त्यांच्या अस्तित्वाच्या दृष्टीने हा अत्यंत महत्त्वाचा आणि संवेदनशील टप्पा असतो. परंतु नेमक्या याच काळात त्यांच्या अधिवासाभोवती गर्दी, वाहनांची वर्दळ, कृत्रिम प्रकाश आणि पर्यटनाचा बाजार उभा राहतो. निसर्गाने स्वतःसाठी रचलेल्या या सोहळ्याला आपण महोत्सवाचे स्वरूप देतो आणि नकळत त्याच्या मूळ उद्देशात हस्तक्षेप करतो.
काजवे फक्त स्वच्छ, ओलसर आणि तुलनेने प्रदूषणमुक्त वातावरणात टिकतात. त्यामुळे एखाद्या भागात काजव्यांची मोठी संख्या आढळणे म्हणजे त्या परिसंस्थेचे आरोग्य चांगले असल्याचे लक्षण मानले जाते. त्यांच्या अळ्या इतर सूक्ष्म जीवांवर उपजीविका करतात, तर स्वतः काजवे आणि त्यांच्या अळ्या अनेक पक्षी, बेडूक आणि इतर जीवांसाठी अन्नाचा स्रोत असतात. त्यामुळे जैवविविधतेच्या साखळीत त्यांचे महत्त्वाचे स्थान आहे. काजवे असणे म्हणजे त्या परिसरात अजूनही निसर्ग जिवंत आहे याचा पुरावा असतो.
काही जण म्हणतात, “आम्ही काजव्यांना हात लावत नाही, मग त्यांना त्रास कसा होतो?” पण निसर्गावर होणारा परिणाम नेहमी प्रत्यक्ष स्पर्शानेच होत नाही. हजारो लोकांची उपस्थिती, वाहनांचे दिवे, मोबाईल फ्लॅश, मोठ्याने होणाऱ्या चर्चा, तुडवला जाणारा पालापाचोळा आणि अधिवासात वाढणारी मानवी हालचाल यांचा एकत्रित परिणाम त्या परिसंस्थेवर होतो. काजव्यांचा संवादच प्रकाशावर आधारित असल्याने अतिरिक्त प्रकाश त्यांच्या नैसर्गिक वर्तनात अडथळा निर्माण करू शकतो. गंमत म्हणजे काजव्यांपासून अंतर ठेवणे म्हणजे त्यांचे संरक्षण करणे, असा समज अनेकांचा असतो. पण एखाद्याच्या घराबाहेर हजारो लोकांची गर्दी करून ‘आम्ही घरात शिरलो नाही’ असे म्हणण्याइतकाच तो तर्क आहे. निसर्गाचा आदर म्हणजे केवळ स्पर्श टाळणे नव्हे, तर त्याच्या जीवनचक्रात अनावश्यक हस्तक्षेप टाळणे होय. विडंबना अशी की, निसर्गप्रेमाच्या नावाखाली निसर्गालाच सर्वाधिक त्रास दिला जातो. "काजवे वाचवा" असे संदेश सोशल मीडियावर शेअर करणारे अनेक जण नकळत प्रकाश प्रदूषण, प्लास्टिक कचरा आणि मानवी हस्तक्षेप वाढवणाऱ्या उपक्रमांचाच भाग बनतात. निसर्गाचे छायाचित्र घेण्याच्या उत्साहात आपण निसर्गाची शांतता हिरावून घेत नाही ना, याचाही विचार होणे आवश्यक आहे. स्थानिकांना रोजगार मिळणे, ग्रामीण पर्यटनाला चालना मिळणे आणि लोकांना निसर्गाशी जोडणे हे निश्चितच सकारात्मक पैलू असतील मात्र आर्थिक लाभ आणि पर्यावरणीय जबाबदारी यामध्ये संतुलन राखणे गरजेचे आहे. नियंत्रित संख्या, प्रकाश आणि ध्वनी प्रदूषणावर मर्यादा, स्थानिक पर्यावरणीय नियम आणि संवर्धनाला प्राधान्य अशा उपाययोजना केल्याशिवाय शाश्वत पर्यटनाची कल्पना अपुरीच ठरते. खरं तर काजवे हे केवळ पर्यटनाचे आकर्षण नाहीत. ते अनेकांच्या बालपणीच्या आठवणींचा भाग आहेत, ग्रामीण जीवनाचे प्रतीक आहेत आणि निसर्गाशी असलेल्या आपल्या भावनिक नात्याचे प्रतिबिंब आहेत. आज जगभरात वाढते प्रकाश प्रदूषण, जंगलतोड आणि अधिवास नष्ट होणे ही काजव्यांसमोरील मोठी आव्हाने मानली जातात. अशा वेळी त्यांना केवळ एक पर्यटनस्थळ म्हणून पाहण्याऐवजी पर्यावरणाच्या आरोग्याचे दूत म्हणून पाहण्याची गरज आहे. कधी कधी प्रश पडतो की, काजवे पाहण्यासाठी महोत्सवाची गरज आहे की महोत्सव चालवण्यासाठी काजव्यांची? कारण काजव्यांचे सौंदर्य त्यांच्या प्रकाशात नाही, तर त्यांच्या स्वातंत्र्यात आहे. ते चमकतात कारण निसर्गाचा तो नियम आहे; कोणाच्याही मनोरंजनासाठी किंवा कॅमेऱ्याच्या चौकटीत कैद होण्यासाठी ते चमकत नसतात. निसर्गातील प्रत्येक जीवाप्रमाणे त्यांचाही या पृथ्वीवर तितकाच अधिकार आहे जितका आपला. पण मनुष्यप्राणी स्वतःच्या सोयीत इतका गुरफटला आहे कि त्याला आपल्या स्वार्थासमोर इतर गोष्टी शुल्लक वाटतात.
मुळात काजवे कालही चमकत होते, आजही चमकतात आणि उद्याही चमकतील. बदलला आहे तो फक्त माणसाचा दृष्टिकोन. निसर्गाचा चमत्कार अनुभवण्याऐवजी त्याचे व्यापारीकरण करण्याची त्याची सवय. कदाचित काजव्यांचा खरा उत्सव त्यांच्या अधिवासाचे रक्षण करण्यात, तिथली शांतता जपण्यात आणि निसर्गाला त्याच्या स्वतःच्या लयीत जगू देण्यात आहे. कारण काही गोष्टी फक्त आदराने आणि कृतज्ञतेने अनुभवायच्या असतात.
उद्या आपल्या मुलांना आणि नातवंडांना जर आपण काजव्यांविषयी फक्त गोष्टी सांगत बसलो आणि प्रत्यक्षात चमकणारे काजवे दाखवू शकलो नाही, तर तो केवळ एका कीटकाचा नव्हे तर आपल्या संवेदनशीलतेचा पराभव असेल हे विसरून चालणार नाही.
- निखिल साळसकर, चाकरमानी