29/11/2022
गोवा चित्रपट महोत्सवातील ज्युरी हेड आणि इस्रायली चित्रपट निर्माते नादव लॅपीड म्हणाले "या महोत्सवातील १५ वा चित्रपट 'द काश्मिर फाईल्स' पाहून आम्हा सगळ्यांनाच धक्का बसला आम्ही खूप अस्वस्थ झालो.आमच्यामते हा चित्रपट एका विशिष्ट विचारधारेचा प्रचार करणारा ( प्रोपगंडा )आणि असभ्य (वल्गर) चित्रपट आहे. एवढ्या प्रतिष्ठित सोहळ्यात या चित्रपटाला स्थान मिळणं हे अयोग्य आहे."
*शेवटी काय तर, दृष्टीकोन महत्वाचा..!*
- नागेश भारत धुर्वे
विवेक रंजन अग्निहोत्री दिग्दर्शित 'द कश्मीर फाईल्स' चित्रपट प्रदर्शित होऊन काहीं महिने उलटून गेलेत. या चित्रपटाने तीनशे पंचवीस कोटी रु. चा व्यवसाय केला. चित्रपटात कोणताही मोठा अभिनेता ( ज्याला आपल्याकडे सुपरस्टार वगैरे म्हटले जाते ) नव्हता, ना यात कोणत्याही मोठ्या अभेनेत्रीने काम केले होते.ना चित्रपटाच्या कथेत विशेष लक्षणीय कलात्मक असं काही होतं. चित्रपट अगदी सुमार दर्जाचाच होता.
मग 'द कश्मीर फाईल्स' चित्रपटात असं काय होतं की, या चित्रपटाने फक्त रेकॉर्डतोड व्यवसायच नाही तर त्या दरम्यान याच चित्रपटाची जिकडे-तिकडे चर्चा सुरू होती. एवढंच नाही तर चित्रपटाचा खेळ झाल्यानंतर थिएटर मध्ये रडारड, घोषणा ( वेगवेगळ्या दृष्टीकोनातून ) दिल्या गेल्या. भाषणं दिली गेली. त्याचे व्हिडिओ समाजमाध्यमात पसरवले गेले. सुरवातीला काहीच स्क्रीनवर प्रदर्शित झालेला हा सिनेमा बघता-बघता हजारो स्क्रिनवर दाखवला गेला.
का? का? का?
कारण या चित्रपटाच्या दिग्दर्शकाने भावना विकल्या. याला मदत संघ परिवाराने उघड-उघड केली. अगदी नरेंद्र मोदी,अमित शहा पासून संघ परिवाराची सर्व प्रचार यंत्रणा या चित्रपटासाठी मैदानात उतरली. सर्व भाजप शासित राज्यांनी या चित्रपटाला करमुक्त केले. अगदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सर्वेसर्वा मोहन भागवत यांनी देखील या चित्रपटाची स्तुती केली.
आता एवढी मोठी यंत्रणा चित्रपटाचा प्रचार करण्यासाठी मैदानात उतरली म्हटल्यावर सर्वसामान्य जनता चित्रपट पाहायला गर्दी करणारच ना. त्यात तोंडी लावायला भावना,रडारड, व्हाट्सअप्प युनिव्हर्सिटी होतीच की...
बरं या चित्रपटाच्या बाबतीत किंवा तो जास्तीत-जास्त लोकांनी बघावा यात संघाचा इतका हस्तक्षेप का ?
यासाठी आपल्याला थोडं मागे जावं लागेल.इतिहासात. नाझी जर्मनी मध्ये देखील अशाच विशिष्ट विचारधारेच्या प्रोपौगंडा चित्रपटांची निर्मिती हिटलरने अगदी नियोजन करून करायला लावली. तिथे 'द इटर्नल ज्यू' सारखी यहुदी विरोधी फिल्म पाहा तुमच्या लक्षात येईल. या चित्रपटाच्या माध्यमातून हिटलरने बहुसंख्य जर्मन लोकांच्या डोक्यात यहुदी विरोधी विष पेरलं. त्याचीच परिणीती साठ लाख यहुदीची हत्त्या. नेमकं अशाच पद्धतीने संघ परिवार देखील आपला हिंदुत्ववादी अजेंडा सर्वसामान्य भारतीय जनमानसात पसरविण्यासाठी अनेक प्रकारे काम करत आहे. त्याचाच भाग आहे 'द कश्मीर फाईल्स' अर्धवट सत्य आणि अनेक तथ्यहीन गोष्टी सरमिसळ करून विवेक अग्निहोत्री ने हा चित्रपट आपल्या गळी उतरवला आहे. त्यासाठी संघाने आपली सर्व हिंदुत्ववादी प्रचार करणारी यंत्रणा त्यावेळी कामाला लावली. काश्मिरी पंडितांची हत्त्या आणि त्यांचं कश्मीर मधून झालेलं पलायन हा संवेदनशील विषय घेऊन विवेक अग्निहोत्रीने 'द कश्मीर फाईल्स' बनवला खरा पण अगदीच चालुगिरी करून अर्धसत्य आणि बरंच खोटं पण अगदी हुशारीने संदर्भहीन गोष्टी या चित्रपटाच्या माध्यमातून खऱ्या इतिहासाच्या नावाखाली आपल्या डोसक्यात अक्षरशः कोंबल्या.
कोणत्याही तर्कशील,संवेदनशील तसेच कश्मीर समस्येबद्दल थोडी-फार जाण असलेल्या व्यक्तीच्या लगेच लक्षात येईल की, द कश्मीर फाईल्स मध्ये दाखवलेल्या अनेक गोष्टी मग त्या संवादाच्या रुपात असो की दृश्याच्या रुपात हे अर्ध सत्य आहे आणि बरंच कोरं असत्य देखील.
जीवनाकडे बघत असताना आपण जसं फक्त जीवनातील ब्लॅक आणि व्हाइट गोष्टीकडे न बघता जीवनात एक ग्रे शेड देखील असते त्याकडे बघितलं पाहिजे तसंच चित्रपट,कला-साहित्याचं देखील आहे. पण कश्मीर फाईल्स बघताना मात्र वारंवार असं वाटतं की, महत्वाची अशी ग्रे शेडच गायब आहे. कश्मीरी पंडितांची हत्त्या झाली, तिथून अनेकांना विस्थापित व्हावं लागलं हे तथ्य कोणीच नाकारू शकत नाही. पण मग कश्मीर मधील सगळेच मुस्लिम कश्मीरी पंडितांच्या विरोधात होते का? तिथे एकाही मुस्लिमाने किंवा मुस्लिम परिवाराने त्या दरम्यान एकाही कश्मीरी पंडीत व्यक्तीला मदत अथवा त्याचे प्राण वाचवले नाहीत असं झालं असेल का? मुळीच नाही. पण फिल्म मध्ये मात्र असंच दाखवलं आहे. तथ्य हे आहे की, ज्या वेळी कश्मीरी पंडीत घाटी सोडून जात होते त्या वेळी बऱ्याच मुस्लिमांची इच्छा होती की, कश्मीर पंडितांनी घाटी सोडून जाऊ नये. म्हणूनच तर घाटी सोडून विस्थापन करणाऱ्या अनेक पंडितांनी आपल्या घराच्या चाव्या आपल्याच शेजारील मुस्लिमांकडे या आशेने ठेवल्या की, त्यांना वाटत होतं की परिस्थिती निवळली तर आपण परत घाटीत येऊ.आजही कश्मीर मध्ये ८००च्या आसपास कश्मीरी पंडीत राहत आहेत. हे मात्र 'द कश्मीर फाईल्स' दाखवले नाही.
का ? कारण कश्मीरी पंडितांवर त्या वेळी ओढवलेल्या त्रासदीच्या नावाखाली भारत भरातील मुस्लिमांविरोधात वातावरण गढूळ करून संघाला आपला हिंदुत्ववादी प्रचार करायचा होता.आणि यात ते यशस्वी देखील झाले. मागे रामनवमी आणि हनुमान जयंतीला काही राज्यात जी हिंसा झाली त्याची तयारी कश्मीर फाईल्स च्या निमित्ताने अगोदरच केली गेली होती. जे पेरलं जातं ते कधी ना कधी उगवणार. कश्मीर फाईल्स ने बऱ्याच सर्वसामान्य जनतेच्या मेंदूत विष पेरलं ते हनुमान जयंती आणि राम नवमी च्या दिवशी बाहेर पडले. नीट थोडं थांबून तुम्ही विचार करा. फिल्म प्रदर्शित झल्यानंतरचा घटनाक्रम बघा. तुमच्या नक्कीच लक्षात येईल. या फिल्मच्या माध्यमातून फक्त मुस्लिमांनाच टार्गेट केलं नाही तर कम्युनिस्टांना देखील अगदी नियोजित पद्धतीनं टार्गेट केलं आहे आणि अर्धवट सत्य-असत्या घटना ज्या वास्तवात झाल्या त्याचा आधार घेऊन काही दृश्ये चित्रपटात दाखवली आहेत. मग ते जे एन यु मधील प्रो. राधिका मेनन चं कॅरेक्टर असो किंवा मुख्य भूमिका असलेलं कृष्णा चं कॅरेक्टर असो. हे करत असताना हा विवेक अग्निहोत्री ने पाकिस्तानी क्रांतिकारी शायर फैज अहमद फैज च्या एका सुंदर अशा क्रांतिकारी गाण्याचा (nazm ) चा वापर इतक्या घेणेरड्या पद्धतीनं केलाय की, अग्निहोत्रीच्या तोंडावर थुकण्याची इच्छा होतेय. असाच वापर कलम ३७० चा देखील केला आहे. अनुपम खेर ने साकारलेलं पात्र कलम ३७० रद्द करण्याची मागणी करतेय असं दाखवलंय चित्रपटात. यालाच फॅसिस्ट हिंदुत्ववादी प्रचार म्हणतात. पण दिग्दर्शकाने अगदी चलाकीने हे लपवले की, ज्या वेळी कश्मीरी पंडितांच्या हत्त्या झाल्या किंवा त्यांचं विस्थापन झालं त्यावेळी केंद्रात सरकार वि.पी. सिंह चं होतं आणि या सरकारला पाठींबा भाजपने दिला होता. जम्मू मध्ये राष्ट्रपती राजवट सुरू होती म्हणजेच सगळा कारभार तत्कालीन राज्यपाल जगमोहन यांचा होता. आणि हे महाशय प्रो-भाजप म्हणून ओळखले जायचे. ही महत्वाची माहिती अग्निहोत्रीने लपवली. का? अजून बऱ्याच गोष्टी आहेत.
ज्या चित्रपटात दाखवल्याच नाहीत. आजपर्यंत कश्मीर मध्ये सर्वात जास्त हत्त्या मुस्लिमांच्या झाल्या आहेत. त्या मध्ये न्याशनल कॉन्फरन्स पक्षांच्या नेत्यांचा, पत्रकारांचा, शिक्षित न्यायप्रिय भारताशी जवळीक साधणाऱ्या बुद्धिवंत मुस्लिमांचा प्रामुख्याने समावेश आहे. चित्रपटात वारंवार उल्लेख येतो की, कश्मीरी पंडितांची हत्त्या या नरसंहार होत्या. नरसंहार हा शब्द देखील अत्यन्त हुशारीनेच वापरला आहे. कारण नरसंहार म्हटलं की, सर्वसामान्य जनतेच्या समोर लाखांचे आकडे येतात. खोटं बोला पण रेटून बोला हा फॅसिस्ट हिंदुत्ववादी प्रचाराचा भाग मुख्य भाग असतो. हा चित्रपट देखील तेच करतो. विवेक अग्निहोत्रीच्या मते चार हजार कश्मीरी पंडितांची हत्त्या झाली. तर कश्मीरी पंडीत संघर्ष समितीचा आकडा सहाशे पन्नास आहे. एवढंच नाही तर संघाच्या प्रकाशित डाटा सांगतो की, सहाशे कश्मीरी पंडितांची हत्त्या त्यावेळी झाली. सांगण्याचा मुद्दा हा आहे की, 'द काश्मीर फाईल्स' निव्वळ भावना विकून अग्निहोत्री आणि संघ परिवाराने खोटं बोला पण रेटून बोला या उक्ती प्रमाणे खोटं दाखवा, असत्य दाखवा, अर्ध सत्य दाखवा, आणि परत जे अर्ध असत्य-सत्य, खोटं दाखवलं आहे . ते कसं पूर्ण सत्य आहे. यासाठी पुन्हा रेटून खोटं बोला. शेवटी एवढंच सांगायचं आहे की, चित्रपट माध्यमाचा वापर किंवा कोणत्याही कलेचा वापर समाजाला आरसा दाखविण्यासाठी केला जातो. तसेच समाज बदलण्यासाठी , त्याला आकार देण्यासाठी देखील केला जाऊ शकतो. विवेक अग्निहोत्री सारखा टुकार दिग्दर्शक लोकांमध्ये तिरस्कार,राग,द्वेष, जाती-जातीत , धर्मा-धर्मात तेढ निर्माण करण्यासाठी, समाजाला मागे घेऊन जाण्यासाठी 'द कश्मीर फाईल्स' सारखे चित्रपट बनवतो. पण तोच एखादा संवेदनशील, मानवतावादी, वैज्ञानिक दृष्टीकोन असलेला दिग्दर्शक समाजाला पुढे घेऊन जाणारा, समाजात प्रेम,भाईचारा वाढवणारा, पुरोगामी विचार पेरणारा चित्रपट बनवतो.
शेवटी काय...
तर दृष्टीकोन महत्वाचा...!