22/02/2018
*'मानाचि लेखक संघटना' आयोजित मालिका प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न*
मुंबई दि.(१९) - मनोरंजन क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या इच्छुकांना टीव्ही मालिकेच्या लेखनापासून संपूर्ण निर्मितीप्रक्रियेची माहिती मिळावी या उद्देशाने मानाचि लेखक संघटनेतर्फे आयोजित करण्यात आलेली विशेष कार्यशाळा नुकतीच उत्साहात पार पडली. कथेच्या बांधणीपासून ते ती चॅनलसमोर कशी सादर करावी, याबाबत मूलभूत प्रशिक्षण मान्यवरांकडून या कार्यशाळेत देण्यात आले. या कार्यशाळेचे आयोजन ३,४,१०,११ व १७,१८ फेब्रुवारी रोजी मुंबईत करण्यात आले होते.
प्रत्येक चांगला वाचक एक उत्तम लेखक बनू शकतो, पण मनोरंजन क्षेत्रासाठी लिहिताना नवोदित लेखकांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन त्यांच्या लेखनशैलीत आवश्यक ते बदल करणे कसे जरुरी आहे याविषयी मार्गदर्शन देत या कार्यशाळेची सुरुवात झाली. तीन आठवड्यांच्या सत्रांत विभागलेल्या या कार्यशाळेत ३-४ फेब्रुवारी रोजी कथा, पटकथा, संवाद लेखनाविषयी शिरीष लाटकर, सचिन दरेकर, पुरुषोत्तम बेर्डे, अभिराम भडकमकर यांनी तसेच आशिष पाथरे, समीर चौघुले यांनी विनोदी लेखन व संवाद या विषयांवर मार्गदर्शन केले. कार्यशाळेच्या द्वितीय सत्रात १०-११ फेब्रुवारी रोजी दिग्दर्शक विनोद लव्हेकर, जालिंदर कुंभार, सचिन गोस्वामी, राजेश देशपांडे यांनी दिग्दर्शन क्षेत्रातील बारकावे व आपले अनुभव सांगत मार्गदर्शन केले. याचबरोबर चिन्मय मांडलेकर, राजेंद्र शिसतकर, सागर कारंडे यांनी अभिनय क्षेत्रातील विविध पैलू शिबिरार्थींना सांगितले. कार्यशाळेच्या तिसऱ्या टप्प्यात १७-१८ फेब्रुवारी रोजी मालिकेसाठी तितकेच महत्त्वाचे असणाऱ्या संकलनाबाबत विद्याधर पाठारे यांनी मार्गदर्शन केले. तर लेखक व चॅनल यांच्यामध्ये दुवा म्हणून निर्माता असतो असे सांगत निर्मितीप्रक्रियेची आणि इतर तांत्रिक गोष्टींची माहिती अतुल केतकर यांनी सहभागींना दिली. कार्यशाळेच्या अंतिम सत्रात विविध चॅनल्सची धुरा सांभाळणारे अनुभवी मान्यवर नितीन वैद्य, दीपक राजाध्यक्ष, श्रावणी देवधर यांनी मालिका क्षेत्राची वाटचाल, आजची स्पर्धा, बदलते ट्रेंड्स याबद्दल माहिती देतानाच लेखकांनी नवनवीन विषयांची मांडणी करून त्यासाठी साजेसे सादरीकरण करावे असे सुचवले. सचिन मोटे, महेंद्र कदम, सुहास कामत, श्रीनिवास नार्वेकर यांनी शिबीर संचालक म्हणून काम पाहिले. या अनोख्या कार्यशाळेत सांगली, सातारा, नाशिक, पुणे, मुंबई, अहमदनगर अशा राज्यातील विविध भागांतून आलेल्या सर्व वयोगटातील सुमारे साठहून अधिक प्रशिक्षणार्थींनी सहभाग घेतला, ज्यामध्ये प्रामुख्याने तरुण तसेच महिलावर्गाचा सहभाग अधिक दिसून आला.
मानाचितर्फे यंदा जानेवारी २०१८ मध्ये मालिका लेखन स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले होते. तब्बल १३८ जणांनी भाग घेतलेल्या अशा प्रकारच्या या पहिल्याच स्पर्धेतील कथा, पटकथा व संवाद लेखन या विभागांतील विजेते पार्थ घाटगे, सौरभ पारखे, महेश घाटपांडे, सरिता आगरकर, रामचंद्र खाटमोडे, मनाली काळे, सौरभ दिघे या सर्वांना ज्येष्ठ अभिनेते अरुण नलावडे आणि अभिनेत्री निर्मिती सावंत यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या प्रसंगी अरुण नलावडे यांनी 'लेखकांकडून आणखी अनोख्या खलनायक पात्रांची, उत्तम नाट्यसंहितांची व मालिकांची निर्मिती व्हावी' असे आवाहन केले. सदर मालिका लेखन स्पर्धेसाठी आनंद म्हसवेकर, राजीव जोशी, जालिंदर कुंभार, पुरुषोत्तम बेर्डे, अरविंद औंधे, संभाजी सावंत, प्रदीप राणे, लक्ष्मीकांत कर्पे, गजेंद्र कोरे, वैभव चिंचाळकर हे मान्यवर लेखक परीक्षक म्हणून लाभले होते.
कार्यशाळेदरम्यान सहभागींचे गट करून त्यांना एक कथा देऊन त्यावर आधारित मालिकेच्या भागाचे लेखन आणि शूटिंग, एडिटिंगचा प्रत्यक्ष अनुभव देत प्रात्यक्षिकही झाले. त्यासाठी अनुभवी मानाचि मार्गदर्शकांबरोबरच चंद्रकांत कणसे, अनिरुद्ध शिंदे, रोहन देशपांडे यांनीही योगदान दिले. सर्व शिबिरार्थींना प्रमाणपत्र देऊन सांगता झालेल्या या कार्यशाळेच्या सफलतेसाठी जनसंपर्क प्रतिनिधी चेतन नाईक तसेच मानाचि सदस्य पराग पुजारी, अनिकेत बोले, सरिता आगरकर, विनायक वावरे, दीपक लांजेकर, वैखरी जोशी, अंजली जोशी, अनुया आपटे आदी स्वयंसेवकांनी काम केले. सरतेशेवटी मानाचि अध्यक्ष सचिन दरेकर यांनी मानाचिच्या पुढील उपक्रमांची माहिती दिली. 'चला एक होऊया, उत्कर्ष साधूया' हे आपले ब्रीदवाक्य सार्थ ठरवत मानाचिने नामवंतांकडून मार्गदर्शन मिळवण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिल्याने सहभागींनी मानाचिचे मन:पूर्वक आभार मानले.