30/06/2018
तुमचं तुमच्या मुलाकडे नीट लक्ष आहे का ?.. स्वतःच्या व्यवसायाच्या नादात मुलगा वाईट मार्गाला लागलाय हे कळत नाही का ?.. घरात एवढी सुख समृद्धी असताना साधे मुलावर संस्कार करायला वेळ नाही ?.. मुलगा इतका फुकट गेलाय तरी त्याच्यावर इतकं अतिरेकी प्रेम करूच कसे शकतात आईबाप ?.. हे आणि असे अनेक प्रश्न सर्वसामान्य माणसाच्या मनात येतात... जो पर्यंत आपण सहजसोपे, सावध आयुष्य जगत असतो तो पर्यंत असे प्रश्न पडणे एकंदर समाजव्यवस्था बघता चुकीचे देखील नाही.. पण,
हा पण खूप महत्त्वाचा आहे.. इतकं सगळं सुखात सुरू असताना देखील केवळ वाईट संगत, आईवडिलांविषयी असलेलं प्रेम आणि मुळातच स्वभावात उपजत असणारी बंडखोर वृत्ती ह्यामुळे वाईट मार्गाला एखादा मुलगा लागणं हे देखील नैसर्गिकच आहे.. अपवादात्मक परिस्थितीत असं होऊ शकतं.. मग अश्यावेळी अश्या विषयावर येणारी कलाकृती बघायची की नाही हा संभ्रम सुरक्षित, सुखासीन आयुष्य जगणाऱ्यांच्या मनात निर्माण होऊ शकतो.. आता नुकताच आलेला "संजू"... संजय दत्त ह्या विचित्र मानसिकतेच्या कलाकारांच्या आयुष्यातील काही घटनांवर आधारित हा सिनेमा... क्षणभर हा सिनेमा संजय दत्त च्या आयुष्यावर आहे हे विसरून एका वाईट मार्गाने गेलेल्या मुलाची कथा म्हणून बघायचा प्रयत्न केला तर.. अरेच्या, हे असं कुठे असतं का ?.. काहीही दाखवतात सिनेमाच्या नावाखाली अशीही प्रतिक्रिया नक्कीच आली असती.. पण अनेक गोष्टी अपवादाने सिद्ध होतात तसं हा "संजू"... ह्या सिनेमात दाखवलेल्या घटना बघितल्यावर काय भयंकर होता हा मुलगा अशी प्रतिक्रिया येऊ शकते.. ह्या सिनेमामध्ये घेण्यासारखं काय आहे ?.. एका देशद्रोह्याने लावलेले दिवे काय बघायचे, नालायक माणूस तो.. वगैरे वगैरे.. अर्थात ह्या प्रतिक्रिया म्हणजे सिनेमा न बघणाऱ्यांच्या आणि आपण किती सच्चे देशभक्त(?) आहोत ह्याचं ओंगळवाणं प्रदर्शन मांडणाऱ्या काही विशिष्ट लोकांच्याच आहेत..
संजय दत्त त्याचं आयुष्य जगला, जगतोय.. खरं तर जे काही फायदा नुकसान झालं असेल ते त्याचं आणि त्याच्या कुटुंबियांच्या बाबतीतील आहे.. आपण त्या भानगडीत का पडावं ?.. पण जेंव्हा देशाच्या सुरक्षेच्या आड एखादं कृत्य आलं की ती बाब सार्वजनिक होते.. त्यात सेलिब्रेटीच आयुष्य हे सार्वजनिकच असतं.. त्यामुळे त्यांच्या उठल्यापासून झोपेपर्यंतची प्रत्येक गोष्ट म्हणजे ब्रेक न्यूज असते.. असं आयुष्य जगणाऱ्या व्यक्तीच्या बाबतीत एखादी संपूर्ण जग, देश हादरवणारी गोष्ट घडली आणि त्यात दुरून दुरून का होईना त्याचा संबंध आला की वाट लागलीच... वृत्तपत्रांना लोकांना चघळायला विषय द्यायचा असतो, मग प्रत्यक्ष काय घडलं काय नाही ह्याची शहानिशा न करताच विधान करायचं आणि शेवटी छोटंसं प्रश्नचिन्ह टाकायचं.. मानवी स्वभावानुसार दुसऱ्यांची लफडी वाचायची सवय असलेली मंडळी हे शेवटचे प्रश्नचिन्ह बदलून त्याचं विधान करतात आणि मिठमसाला लावून आणखी जोरदार फोडणी देतात.. आजसुद्धा देशद्रोही, अतिरेकी हे लेबल लावून मोकळं होतात.. पण संविधानानुसार त्या व्यक्तीने "शिक्षा" पूर्ण उपभोगलेली आहे हे सोयीस्कर पणे विसरतात.. मला नेहमी एक प्रश्न पडतो.. आपल्याला दुसऱ्याला बोलायचा अधिकार असतो का ?.. ज्याने आयुष्यात कधीच कुठलीच चूक किंवा गुन्हा केलेला नाहीये त्या व्यक्तीलाच हा अधिकार मिळू शकतो पण अशी एकतरी व्यक्ती ह्या पृथ्वीतलावर आहे का ?.. किंवा असू शकते का ?.. माझ्या माहितीत तरी नाही.. कारण प्रत्येकाच्या चुकीची किंवा गुन्ह्याची व्याख्या वेगवेगळी असते...
संजय दत्त चा मी फॅन नाही, त्याला आयडॉल करण्याचा हा प्रयत्न अजिबात नाही.. पण त्याच्या पापाची शिक्षा त्याने कायद्यानुसार भोगलेली आहे मग त्याला पुन्हा सर्वसामान्य माणूस म्हणून आयुष्य जगायचा अधिकार नाही का ?..
त्याने आयुष्यात काय नाही केलं हा प्रश्न आहेच.. दारू, अंमली पदार्थ सेवन, बायकांची लफडी, भीक मागणं, खोटं बोलणं, अंडरवर्ल्ड बरोबर संगत, बेकायदा शस्त्र बाळगणं, बेधुंद आयुष्य जगणं.. सगळं केलं त्याचं समर्थन होऊच शकत नाही, पण हे सगळं केल्यानंतरही त्याच्या पापाची शिक्षा त्याने कायद्यात राहून पूर्ण केल्यावरदेखील त्याला "दोषी"च ठरवणं हे चुकीचं वाटतं.. काल हा सिनेमा बघताना पिनड्रॉप शांतता होती इतके सगळे प्रेक्षक भारावून गेलेले होते..
आता हा सिनेमा राजकुमार हिराणी, विधू विनोद चोप्रा आणि अभिजात जोशी ह्या सुपरहिट त्रयीचा आहे म्हटल्यावर अपेक्षा उंचावलेल्या होत्याच, त्या हा सिनेमा बघितल्या नंतर ह्या तिघांनी यशाचं शिखर गाठल्याचा प्रत्यय आला..
रणबीर कपूर.. बर्फी, रॉकेट सिंग सारखे सिनेमा केल्यानंतर मध्यंतरी अत्यंत टुकार सिनेमे ह्याने केलेले आहेत, अरे एवढी गुणवत्ता ठासून भरलेली आहे तर असले सिनेमे हा माणूस का करतो असा प्रश्न पडायचा, पण "संजू" मध्ये संधी मिळाल्यावर सोनं केलंय.. पडद्यावर बघताना हा रणबीर नाही तर संजय दत्तच रोल करतोय इतका तो ही भूमिका जगलाय.. परेश रावल, विकी कौशल, दिया मिर्झा, अनुष्का शर्मा, जिम सरभ ह्यानी साकारलेल्या व्यक्तिरेखा सिनेमाला एका उंचीवर नेतात.. कथा, पटकथा, संवाद, संगीत, बॅकग्राउंड स्कोअर, अभिनय, दिग्दर्शन कशातच हा सिनेमा कमी पडत नाही.. बायोपिक असूनही सिनेमाचाच फील हा सिनेमा देतो हे ह्या सिनेमाचं मोठ्ठ वैशिष्ट्य आहे.. पण हा फील देतानाच अनावश्यक प्रणय दृश्य, हाणामारी, आयटम सॉंग ह्या मसाल्याची आठवण देखील येत नाही हे राजू हिराणीच कौतुक आहे..
वाईट मार्गाला गेलेल्या आणि आपल्या चुकांची, गुन्ह्याची शिक्षा भोगून नकारात्मक गोष्टींमधून बाहेर पडून सकारात्मक आयुष्य जगणाऱ्या एका मुलाची.. आपला आपल्या मुलावर विश्वास ठेवून खंबीरपणे शेवटपर्यंत साथ देणाऱ्या बापाची, इतक्या भानगडी करून देखील साथ न सोडणाऱ्या बायकोची आणि मैत्रीचे धागे घट्ट करणाऱ्या मित्राची आणि मित्र कसा नसावा हे देखील सांगणारी गोष्ट आवर्जून थिएटर मध्ये जाऊनच बघा... सिनेमा कसा असावा ह्याचा एक परिपूर्ण अनुभव मिळण्याची 100 टक्के खात्री देणारा असा हा "संजू"...
- आशीर्वाद मराठे