26/10/2021
*स्वानंदमळा*
*हिरवी पोर्टरेटस .. पुरुषोत्तम बेर्डे*
महाडच्या एस टी स्टँडवर आपल्या हातातली मेडिकल रिपरेजेटिंव्हची बॅग शेजारी ठेवून विमनस्क मनस्थितीत स्वानंद बसला होता. आज ते तिघे मित्र एकत्र बसून ठरवणार होते, पुढे जे करायचे आहे ते नक्की करायचे की नाही. उरलेल्या दोघांची तो वाट पहाट होता. त्याच्या बरोबरच रत्नागिरीहून रायगड जिल्ह्यात पोस्टिंग झालेले, गुरुप्रसाद बोरकर आणि मंगेश गुरव हे दोन मित्र तिथे येणार होते. चहा मारावा म्हणून स्वानंद उठला. प्रवाशांची गर्दी कमी नव्हती. आगरी, कोंकणी, मुंबईची मराठी, कोंकणी उर्दू, आशा भाषांच मिश्रण त्या गोंगाटात ऐकायला मिळत होते. एका बाकावर बॅग ठेवून लांबूनच तिच्यावर लक्ष ठेवत स्वानंद चहाच्या स्टॉलवर आला. बॅगेकडे बघत बघत चहाचे घोट घेत राहिला. खरे तर ती बॅग कोणी पळवली असती तर तिचे वजन आणि आतमध्ये एकही कामाची गोष्ट नाही असे पाहून चोराने ती परत आणून दिली असती. जिल्ह्यातल्या डॉक्टरांचे पत्ते, औषधांची लीफलेट्स आणि सॅंपल्स यांनी खचाखच भरलेली ती बॅग स्वानंदशिवाय कोणाच्याच उपयोगाची नव्हती. पुढच्या एक दोन एस ट्यांमधून दोघे आले आणि नंतर तिथून रिक्षाने विसावा रेस्टॉरंट मध्ये येऊन बसले.
आजचा निर्णय खूप महत्वाचा होता. गुरुप्रसाद मुळात वकील होता. रत्नागिरीत वकिली करीत होता. तर मंगेश मार्केटिंग मध्ये होता. तिघे शाळेतले घट्ट मित्र. शिक्षण वेगळे झाले तरी मैत्री कायम होती. गेले चार वर्षे फर्मसीटिकल कंपनीत गुरु कायदेशीर सल्लागार, आनंद एम आर, आणि मंगेश मार्केटिंग करीत होता. विशेष म्हणजे तिघांनाही रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा फिरून कामे करावी लागत होती आणि ती तेलाच्या घाण्याला जुंपलेल्या बैलांसारखी गोल गोल फिरून पायपीट करावी लागत होती. मानेवरच्या या जोखडीचा आणि निरर्थक फिरण्याचा तिघांनाही कंटाळा आला होता. शिवाय त्यातून काही निष्पन्न होत नव्हते. त्यापेक्षा शेतावर नांगराला जुंपलेले बैल होणं बरं. ही जोतं निदान वर्षातून महिनाभर धरली जातात, बाकी सहा महीने बैलगाडीला. पवसाळ्यातले चार महीने मनसोक्त चरायचं, रानावनात हिंडायचं. असा बांधनतोड विचार त्यांच्या मनात रंगत होता. त्यामुळे ‘आपण नोकरी सोडून उद्योग करूया’ या निष्कर्षाला येऊन त्यांनी आजची मीटिंग ठरवली होती.
रत्नागिरी जिल्ह्यात काजू मुबलक पिकतो, पण सिंधुदुर्गएवढा नाही, तरी नीट संघटित पीक काढलं आणि एक कॅशयू प्रोसेसिंगची फॅक्टरी काढली तर रत्नागिरीत तो नवा उद्योग म्हणून त्याचे स्वागत होईल. पण भांडवलाचं काय? किती लागेल? पुढ्यातल्या ‘प्रोजेक्ट रिपोर्ट’ या विषयावर तिघे चहा कांदे पोहे, ते बटाटेवड्या वरुन दुपारच्या जेवणा पर्यन्त पोचले. लांजा तालुक्यातल्या बोरथडे या मंगेशच्या गावात, फॅक्टरी सुरू करण्याच्या निर्णयावर येऊन तिघांनी पुन्हा आपल्या एसत्या पकडल्या आणि रत्नागिरी जिल्ह्यातल्या आपल्या गावी परतले.
मुंबई गोंवा रस्त्याचे काम सुरू आहे. चौपदरी रस्ता होतोय. खारेपाटण हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिले गांव. तिथे मी अलीकडे घर बांधले. वरचेवर तिकडे जाताना वाटेत माझे वाडीलोपार्जित गाव पन्हाळे लागते, आणि त्यानंतर आजोळ वकेड, जिकडे मी अगदी कोकणाच्या ओढीने लहानपणापासून जातोय. लांजानंतर अकरा किलोमीटर्स वर असलेला वकेडचा घाट संपला की लक्ष्मीबाग लागते. नाव लक्ष्मीबाग असले तरी तिथे बाग कुठेच दिसत नाही. मात्र अलीकडे, गेले काही वर्षे, त्याच्या अलीकडे माळरानावर एक नर्सरी डेवलप झालेली दिसते. खूप आकर्षक दिसते ती लांबून . पण प्रत्यक्षात तिकडे जायचा योग आला नाही. तरी उत्सुकता होती. यावर्षी एप्रिल-मे महिन्यात झालेल्या लॉक-डाउन मध्ये मी खारेपाटणच्या बंगल्यावर अडकून पडलो. तेवढ्यात वकेडचा सुप्रसिद्ध ‘रामनवमी उत्सव’ आला. आणि माझे पाय आपोआप वकेडला माझ्या आजोळी वळले. लॉक-डाउनच्या नियमांमुळे अत्यंत तुरळक उपस्थितीत ‘उत्सव’ साजरा होत होता. श्रीराम फंडातर्फे हा उत्सव साजरा होतो, त्यांचे पदाधिकारी मात्र जे आधीच गावात होते ते आले होते. तिकडे एक तरुण मुलगा मोठ्या उत्साहाने वावरताना दिसला. त्याच्या बद्धल उत्सुकता निर्माण झाली. थोड्या वेळाने तो आपल्या मोटरसायकलवर बसून निघून गेला आणि अर्ध्या तासाने परत आला. त्याला सोडून तिथल्या संगळ्यांना मी ओळखत होतो. हा नवीन पिढीतला मुलगा कोण? असा प्रश्न पडेपर्यन्त शेखर शेटयेने मला त्याची ओळख करून दिली. ‘ हा स्वानंद विजय शेटये, पोल्ट्रीवाले विजय शेटये यांचा मुलगा. सध्या याची वरच्या बाजूला असलेल्या खालच्या वाडीत, भरडावर नर्सरी आहे. ह्यानेच ती डेवलप केलेय. शुभांगी नर्सरी.’
त्या हिरव्यागार नर्सरीचे कोडे आशा प्रकारे उलगडले. जीन्स आणि सफेत ती शर्ट घातलेला तो तरुण प्रचंड उत्साहाने माझ्याशी बोलू लागला. ‘पुरूकाका, घाई नसेल तर रामजन्मानंतर माझ्या नर्सरीवर या ना’ मी जणू आमंत्रणांची वाटच पहात होतो. देवळातला उत्सव संपताच त्या छोट्याशा घाटीवरुन मी माझ्या गाडीने निघालो. पुढे त्याच्या मोटर सायकलीवर तो होता... स्वानंद.. नावाप्रमाणे स्वत:च्या आनंदात मश्गुल.. त्या नर्सरी समोर तो थांबला, मी गाडीतून उतरलो आणि त्याच्या भल्या मोठ्या नर्सरीत शिरलो. शेकडो छोटी छोटी झाडं, रांगेत मांडून ठेवली होती. स्वानंद नावानिशी त्या झाडांची ओळख करून देऊ लागला. माझे पाय आपोआप त्याच्या मागे ओढले जाऊ लागले. नंतर त्याच्या लक्षात आले, आपण पाणी सुद्धा विचारले नाही. त्याच्या एका गडयाने छान विहीरीतले पाणी आणून दिले. त्याबरोबर गुळाचा एक खडा. ‘ पुरुकाका, ही तिथपर्यन्त दिसते ती आमची बाग.’ याला बाग म्हणणे म्हणजे मुंबईतल्या हँगिंग गार्डन ला कुंडी म्हणण्यासारखे होते. प्रचंड लांब पर्यन्त पसरलेला परिसर होता तो. हायवे वरुनतर फक्त हिरवी नर्सरी दिसत होती. मी आत पाहतो तर लांब पर्यन्त विविध प्रकारची झाडे, आणि कलमं व शेतीही दिसत होती. ‘हे सर्व मी गेल्या दहा बारा वर्षात डेवलप केलय .. आणि ती समोर पोल्ट्री , आणि बाजूला गुरांचा वाडा, दहा गाई आणि पंचवीस म्हशी आहेत. शिवाय बैलजोड्या, आणि तो तिथे ट्रॅक्टर.’ त्याचा उत्साह आणि लिस्ट बघून मी दडपून गेलो.
तिथल्याच एका सावलीतल्या पारावार मी बसलो. ‘ही इथे रांगेत दहा झाडं दिसतयात नां, ती काळी मिरी लावलेय, या वर्षी मसल्याचं उत्पन्न काढायला सुरुवात करतोय, तिकडे हळद आणि इकडे मिरच्या. तिकडे खाली जी रांग दिसते झाडांची, ती काजूची झाडं आहेत आणि त्याच्या खाली आंब्याची कलमं, सगळी रत्नागिरी हापुसची आहेत. तिथून पुढे खालच्या बाजूला भातशेती, आता आणखी विहिरी खणून बारमाही शेती करायचा विचार आहे.’ बाप रे, स्वानंदने माहितीचा धडाका लावला.. ‘जाऊ या खाली बघायला?’ नाक्यावर राऊंड मारायला जाऊया का का ? आशा थाटात त्याने विचारले.. मी ही त्याला दुखवू नये म्हणून ‘हो’ म्हणणार एवढ्यात त्याला विचारले.. ‘किती वेळ लागेल?’ फार नाही, तासभर लागेल सगळं बघायला, बारा एकरचा परिसर आहे सगळा.’ मी हातानेच ‘नको’ म्हटले, दुपारच्या कडक उन्हात तो काश्मीरला असल्यासारखा फिरत होता. आणि मी सहारा वाळवंटात असल्यासारखा. ‘फोटो वगैरे नाहीत काय? ‘ मी आपला सोयीचा प्रश्न विचारला. ‘चला आपण घरी जाऊन पन्ह किंवा कोकम सरबत घेऊया.’
एवढ्याशा फिरण्याने माझी दमछाक झाली होती. कपिल देव च्या नवीन बॉलवर बॅटिंग करावी तशी माझी अवस्था होती. त्याचा उत्साह मात्र दांडगा होता. ‘मी दिवसभरात चार फेऱ्या मरतो या बागेत.’ ‘बाइक ने ना ?’ ‘ नाही, चालत’ पुन्हा एक वाईड बॉल आला. ‘चालत.?. बारा एकर?’ ‘तेव्हढं करावाच लागतं, गडी माणसं राबत असतात, त्याना गाईड कारवं लागतं.’ मी ही अगदी कृषितज्ञ असल्या सारखी मान हलवली. ‘ हो तर ? अगदी बरोबर.’ तेवढ्यात एक साताठ वर्षांची छोटी मुलगी आणि एक तरुणी कोकम सरबत आणि आंबेवड्या घेऊब आली. ‘ पुरू काका, ही माझी मुलगी हर्षाला, आणि ही पत्नी मौसमी..’
‘हे सगळं तु गेल्या दहा वर्षात उभं केलस?’ ‘ हो काका, पंधरा सोळा वर्षांपूर्वी मी नोकरी सोडली, मी राजपूरला शिकलो, बी एस सी (फार्मा) झाल्यावर मी एम आर ची नोकरी केली. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा पिंजून काढला, त्या दारम्याने दुसऱ्या बाजूने शेती विषयक शिक्षणही झाले. माझा एक मित्र कृषि पदवीधर आहे, आणि एक वकील. घरच्यांच्या आग्रहाखातर आम्ही नोकऱ्या केल्या आणि एके दिवशी ठरवून त्या सोडल्या देखील. त्यांच्या बरोबर भागीदारीत काजू प्रक्रियेची फॅक्टरी काढली बोरथड्याला, पण त्यात विशेष यश मिळाले नाही. काजू कमी पडला णी भांडवलही. मग आम्ही सेपरेट झालो, तेवढ्यात मी माझ्या गावात एक एकरमध्ये माझ्या वडिलांची पोल्ट्री जी बंद पडली होती, ती नव्याने सुरू केली, आणि ऊरलेल्या भागात आईच्या नावाने ‘शुभांगी’ नर्सरी सुरू केली. चार वर्षे जिल्ह्यांमध्ये जी पायपीट केली, आणि शेतीविषयक ज्ञान मिळवले, त्या जोरावर यश मिळाले, नशिबाने साथ दिली आणि नर्सरीच्या पुढे पसरलेल्या डोंगरात आमची बारा एकर पडीक जमीन होती, तीची मशागत सुरू केली, आणि आज ती चांगलीच फुलून आलेय, बारा पंधरा लोकांचा स्टाफ आहे. त्यांची कुटुंबसुद्धा हीच शेती पोसते, अगदी लॉक-डाउन मध्येही कामं बंद नाही झाली, निसर्गाने ‘कोविड’ फेकून दिला आणि आम्ही सर्व त्याला सामोरे गेलो, शिवाय घरात डॉक्टर आहेच.’ पुढचा धक्का मोठा होता. स्वानंदची बायको मौसमी, ही डॉक्टर आहे. डॉ. मौसमी बी एस एम एस आहे. शेजारचे गांव कुवे आणि वकेड इथे ती सकाळ संध्याकाळ रुग्ण सेवा करते. आजपर्यंत या खेडेगावात कुणी डॉक्टर टिकले नाहीत, आजही तालुक्याच्या गावांत किंवा जिल्ह्याच्या हॉस्पिटल शिवाय चांगले डॉक्टर किंवा हॉस्पिटल्स नाहीत. मला या तरुण जोडप्याचं कौतुक वाटलं. ‘हर्षाला इथल्याच जवळच्या ‘ओणी’च्या शाळेत शिकते, नुकतंच तिथे एक इंटर नॅशनल स्कूल सुरू झालंय.’ ‘वा ,,, छान .. लव्ह मॅरेज? ‘ मी आश्चर्याने प्रश्न विचारला, ‘हो पण दोन्ही, , हीने वेंगुर्ल्यात मेडिकल शिक्षण पूर्ण केलं, आणि माझाही मेडिकल व्यवसाय, त्यामुळे तेव्हा ओळख झाली, आणि मग घरून संमती मिळून मग आम्ही लग्न केलं, तेव्हा मीही नुकतीच नर्सरी सुरू केली होती.’
स्वानंद हा कोकणातला तरुण शेतकरी आहे. इथल्या सुजलाम सुफलाम जमिनीचा आणि पावसापाण्याचा पूर्ण फायदा घेतोय, नव्या नव्या योजना राबवून शेती वाढवतोय. हायवेला लागून असलेल्या त्याच्या जागेत त्यानं नंदनवन फुलववलय. ‘पुरुकाका, ही डाव्या बाजूला जमीन दिसतेय, तिथे अॅगरो टुरिझम सुरू करायचेय, टुरिस्ट बंगल्यांची स्कीम राबवणार आहे, तो पर्यन्त हाय वे पूर्ण होईल, अगदी लेफ्ट टर्न घेतला की शंभर फुटांवर माझे अॅगरो टुरिझम.. ‘ स्वानंदच्या डोळ्यांमधल्या स्वप्नांना अंत नव्हता. ‘गावाकडे चला’ म्हणणाऱ्यांना स्वानंदने आणि त्याच्या बायकोने चोख उत्तर दिले. ते गावातच आहेत, अगदी खेडेगावात. त्यांचा एक हात वनश्रींमध्ये रमलाय व पाय जोताच्या बैलांसारखे अखंड शेतीत राबतायत, तेही आधुनिक तंत्र वापरुन. उजवीकडे रत्नागिरी, कोल्हापूर, पुणे मुंबईसारखी शहरं, तर डावीकडे, कणकवली सावंतवाडी, आणि गोवा. पण खेडेगाव सोडून शहरात जाऊन सेटल होण्याचा विचार सुद्धा मनात नाही. आज ज्या काळात पुण्या मुंबईतले आई वडील आपली मुलं इंग्लंड अमेरिकेत सेटल झालेली मोठ्या अभिमानाने सांगतायत, त्याकाळात स्वानंद आणि मौसमी सारखी आजची तरुण पिढी कोकणांतल्या अनेक खेड्यांमध्ये कामानिमित्त सेटल होताना दिसते. ना त्याना मॉलचे आकर्षण, ना सिनेमाथेटरांचे. अगदी पाहटे पांच वाजता उठून आपल्या नर्सरीतली सकाळ सुरू करून रात्री पर्यन्त कामात बुडवून घेणारी ही गावातली पिढी, आणि त्याचवेळी मोठ्या शहरातली ओ टी टीवरच्या लांबलचक सिरिज बघण्यात गुंतलेली आजची पिढी. डॉक्टर मौसमीच्या दवाखान्याचा आधार, रात्री आपरात्रीही पांचक्रोशीतल्या गावांना आहे. आणि त्याचवेळी आजूबाजूच्या गावातल्या शेतकऱ्यांना आपल्या अनुभवांचा मोलाचा सल्ला देऊन स्वानंद एकूण आजूबाजूची हिरवळही वाढवत आहे.
अस्वस्थपणे तेलाच्या घाण्यावरच्या बैलांसारखे नोकरीच्या फेऱ्यात गोल गोल न फिरता, शहरांची आणि परदेशाची आकर्षणे नाकारून, एक पिढी शहाणी होऊन शेतातल्या नांगराचे ‘जोत’ हातात धरून हिरवळ उगवत आहे, त्याचा फुलोरा काही वर्षात नक्कीच दिसेल.
*स्वानंदमळा*
*हिरवी पोर्टरेटस .. पुरुषोत्तम बेर्डे*