20/05/2022
सुभाष अवचट यांचे शब्द..
थांबणे..!
कुठे..?
केव्हा..?
कसे थांबावे..?
ही एक कला आहे.
ती सर्व कलांमध्ये लागू होते..!
कविता, कथा, कादंबरी, चित्र, शिल्पात कुठे थांबायचे याला संयम आणि विवेक लागतो. अन्यथा आशय भरकटत जातो. तसे जीवनातही घडते..
पु. ल. देशपांडे यांनीही वेळेनुसार आवराआवर केली. देणग्या देऊन, पुस्तके/ पुस्तकांचे हक्क त्यांनी वाटून टाकून ते मुक्त झाले आणि उरलेले आयुष्य एक गिफ्ट मिळाल्यासारखे हसत जगले.
'जोपर्यंत लोकांना वाटते आपण अजून खेळावे, तीच थांबण्याची योग्य वेळ असते...!,' हे सुनील गावस्करचे वाक्य तंतोतंत यात बसते. कोठे थांबावे हाच संयम त्यात आहे.
जगण्याच्या या शर्यतीत प्रत्येक जण निराळे मार्ग शोधतो. बहुतेकांना ते आयते हवे असतात. कोणाच्या तरी खांद्याची, दैवताची डोके ठेवण्याची त्यांची गरज असते. पण विसर्जन हा तुमच्या बौद्धिक पातळीचा, मनाचा एक भाग आतल्या आत असतो; जो भाग एखादा गुरू प्रसाद म्हणून तुमच्या हातात देत नाही.
कोऱ्या हॅण्डमेड पेपरवर रंगाचा पहिला ठिपका टाकल्यावर तो हळुवार पसरत जातो. पुन्हा अनेक रंगांत तो मिसळत जातो. त्याच्या कंट्रोल्ड ओघळांनी किंवा छटांनी एक चित्र बनते. कधी ते देखणे दिसते, कधी जमत नाही. हे महत्त्वाचे नाही. ती प्रोसेसच दैवी असते. त्या कागदावरच्या रंगाच्या प्रत्येक ठिपक्यात पारदर्शक विसर्जनाचे क्षण तरंगत असतात.. बदलत राहतात. विघटन हे अलौकिक अॅबस्ट्रॅक्ट नॅचरल चराचरातील मौनच असते.
जंगलात, ऋतुचक्रात हे सामावलेले असते. हत्तीला कळते आपले दिवस संपायला आलेत. कळपातून तो अपरात्री गुपचूप पाय न वाजवता निघतो आणि पूर्वीच शोधलेल्या गुप्त ठिकाणाकडे तो चालत राहतो. तो तेथे पोहोचतो आणि स्थिर उभा राहतो. त्याचा एवढा प्रचंड बलवान देह हळूहळू काही दिवसांत संपतो आणि मातीशी एकरूप होतो..!
हे विसर्जन..!
आजकाल लोकाना कुठे थांबावे हेच समजत नाही. जीव संपला तरी हावरटपणा जात नाही. छाती फुटेपर्यंत लोक धावत असतात मागे वळून बघत नाही. स्वत:ची पर्वा नसते का..? तर जेवढे कमवता येईल तवढे पदरात पाडून घ्यायचे पण एक दिवस सर्व असुनही सर्व संपल्यासारखे दिवस येतात तेव्हा हातात फक्त निराशा आणि अंधारच दिसतो.ऐश्वर्य येते पण ते भोगायची मनस्थिती नसते. मग जीवनभर एवढे पळून काय उपयोग झाला. शेवटी हे सगळे मायाजाल न संपणारे आहेत. त्यातून आपणच ठरवून विरक्त होणे केव्हाही चांगलेच..!
विचार करण्यासारखी गोष्ट आहे पण तेवढा पण वेळ आपल्याला नाही..!
अवचट सरांचा हा विचार मला आजघडीला योग्य आणि महत्वपूर्ण वाटतो.म्हणून रिदम नगरी ढोल पथकाचा प्रमुख म्हणून मी आज ढोल पथक बंद करण्याचा निर्णय घेत आहे. गेली काही वर्ष मी आणि माझे अनेक सहकारी या पडघम वादय संस्कृती मधील ढोल पथक वादय संस्कृती च्या वाढी करिता संघर्षमयी वाटचालीतुन संघर्ष करीत आम्ही ही संस्कृती जपली आणि तिला मोठे व्यापक स्वरूप देण्याचा प्रयत्न केला. कोरोना काळाचा आपल्या सर्वांच्या जीवनावर पडलेला प्रभाव व या संस्कृतीच्या व कलेच्या मर्यादा ओलांडून काहीजन करू पहनारा प्रयत्न, अट्टहास माझ्या निदर्शनास आले. ते या वादय संस्कृती ला घातक व गालबोट लावनारे ठरू नये म्हणून मी आमचे पथक बंद करण्याचा निर्णय घेत आहे व यामधील स्पर्धा कमी करण्याचा निर्णय घेत आहोत. शेवटी पथक हे नवीन घडत जातात, बंद देखील पडतात परंतु यामधील 'वादक' घडला पाहिजे हे महत्वाचे…येत्या गणेश उत्सवात सर्व वादकांना शुभेच्छा..