04/06/2025
लोककल्याणकारी अहिल्याबाई होळकर भाग 9 -
अहिल्याबाई या अतिशय कर्तबगार अशा प्रशासक होत्या. आपल्या राज्यामध्ये शांती, सुरक्षा, समृद्धी आणि सुबत्ता नांदण्यासाठी त्यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले. माळव्यांवरून वाहणाऱ्या नर्मदा नदीला मुळातच पाणी मुबलक आहे त्यातही अहिल्याबाईंनी नदीला कालवे काढले, पाट बांधले आणि प्रत्येक शेताला शेतीसाठी आणि सर्व माणसांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून दिले. "पाणी शुद्ध तर आरोग्य मस्त" हा मूलमंत्र त्यांनी जाणला होता. त्यामुळे पिण्याचे पाणी शुद्ध राहावे यासाठी पिण्याच्या पाण्याचे कालवे वेगळे असत. तर कपडे धुण्यासाठी, आंघोळ करण्यासाठी, जनावरे धुण्यासाठी असणारे पाट वेगळे असत. सांडपाणी निचरा होण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था असे. जागोजागी विहिरी खणून, कुंडे उभारून जल व्यवस्थापन केले जाई. आंबा, वड, पिंपळ, चिंच अशी झाडे लावून माती वाहून जाणार नाही अशी व्यवस्था केली जाई. झाडांची मुळे मातीला घट्ट धरून बसत त्यामुळे भूजल पातळी स्थिर राहण्यासाठी मदत होई. झाडांमुळे पांथस्थांना सावली मिळे आणि फळेही खाण्यास मिळत. जमीन नसलेल्या शेतकऱ्यांना झाडे लावण्यासाठी पडीक जमीन दिले जात असे शेतकऱ्याने जर वीस झाडे लावली तर त्यातील नऊ झाडाचे उत्पन्न शेतकऱ्याचे आणि 11 झाडांचे उत्पन्न सरकारचे असा नियम होता. एखाद्या वर्षी पीक कमी आले तर शेतसारा कमी केला जाई. गाई गुरांना चरण्यासाठी त्यांनी वेगळी शेते राखून ठेवली. माळवा प्रांत देशाच्या मध्यभागात येत असल्यामुळे पूर्वेकडून पश्चिमेकडे आणि उत्तर दक्षिण जाणाऱ्या लोकांसाठी,व्यापाऱ्यांसाठी, यात्रेकरूंसाठी हा जायचा रस्ता होता. लोकांची यात्रा सुलभ आणि आनंददायी व्हावी आणि व्यापार वाढावा म्हणून त्यांनी अनेक ठिकाणी रस्ते बांधले. रस्त्याच्या कडेला सावली देणारी झाडे लावली. लोकांना अन्न, वस्त्र, निवारा उपलब्ध व्हावा, सुखी समृद्ध आयुष्य जगता म्हणून त्यांचे सर्वतोपरी प्रयत्न असत.
वेगवेगळ्या उद्योगांना व कलांना त्यांनी प्रोत्साहन दिले एका विशिष्ट प्रकारचे दगड नर्मदेच्या परिसरात भरपूर उपलब्ध असत त्याच्यातून शिल्प करण्यासाठी त्यांनी प्रोत्साहन दिले मोरोपंतांसारखे विद्वान कवी तसेच अनंत फंदीसारखे कवी यांना त्यांनी आपल्या राज्यात बोलावून राजाश्रय दिला. एकदा एका कवीने त्यांच्या स्तुती पर काव्य लिहिल, तेव्हा त्यांनी ते सरळ नर्मदेत अर्पण केले आणि त्यांना सांगितले की माझ्याबद्दल लिहिण्याऐवजी परमेश्वराचे गुणगान गा म्हणजे तुमचं कल्याण होईल. अशा होत्या अहिल्याबाई, लोककल्याणकारी आणि तरीही अध्यात्मिक आणि विरागी !