27/02/2022
काहीजण रोज वाचताहेत !
अजून खूप लोकांना ऐकायचं आहे !
इंदिरा संत.
विसाव्या शतकातील एक उल्लेखनीय मराठी कवी म्हणजे
साधेपणा,स्वाभाविकता, प्रांजलपणा आणि एक अखंड संवादलय ही त्यांच्या कवितेची वैशिष्टये. रसिकांच्या प्रेमाबरोबरच राजमान्यता लाभलेल्या या कवीला साहित्य अकादमी, जनस्थान आदि प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरवले गेले होते.
४ जानेवारी १९१४ रोजी विजापूर जिल्ह्यात इंडी येथे इंदिराबाईंचा जन्म झाला. १३ जुलै २००० रोजी वयाच्या ८६ व्या वर्षी बेळगाव येथे वृध्दापकाळाने त्यांचे दुःखद निधन झाले. फर्ग्युसन कॉलेजात शिकत असताना कवी व निबंधकार श्री. ना.मा. संत यांच्याशी त्यांचा विवाह झाला. प्रथम प्राध्यापक व नंतर प्राचार्य म्हणून बेळगावच्या ट्रेनिंग कॉलेजमध्ये त्यांनी १९७२ सालापर्यंत काम केले.
कविता हा माझ्या लेखनाचा आणि जगण्याचा गाभा आहे’ असे त्या स्वतःबद्दल म्हणत. त्यांच्या शेला, मेंदी, रंगबावरी या कवितासंग्रहांना राज्यशासनाचे पुरस्कार लाभले तर गर्भरेशीमला साहित्य अकादमीचे पारितोषिक मिळाले. १९९५ साली तिसरा जनस्थान पुरस्कार लाभला. तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाची गौरववृत्तीही लाभली.
स्त्री जीवनातल्या प्रतिमा निसर्गजीवनात अशा चपखल बसून जातात. कवितेतून जाणवणारे आत्ममग्न, एकाकीपणाचा वसा निष्ठेने जपणारे, अत्यंत तरल, संपन्न, निसर्गजाणीव असलेले, दुःखाला धैर्याने तोंड देणारे आपले स्त्रीत्व विलक्षण मनस्वीपणे त्या आपल्या कवितेतून जपत आल्या आहेत. अनुभवाला कलात्मक रूप देताना एक फसवा सोपेपणा त्यांच्या कवितेत वरवर दिसतो, पण इंदिराबाईंची कविता घट्ट आशयघन आणि वरवरच्या अर्थापेक्षा अधिक काही खोल जाणवून देणारी असते. कवितेचे सर्व घटक सेंद्रिय एकात्मतेने इतके चपखल बसलेेले असतात की त्यातला कानामात्रेचा फरकही कवितेची जान आणि शान बिघडवून टाकील. शब्दांचं पारदर्शित्व आणि हिरकणीच्या प्रत्येक कोनातून सौंदर्याच्या शेकडो छटा पाझराव्यात तसे शब्दांचे बहुविध अर्थलावण्य हे त्यांच्या कवितेचे सामर्थ्य आहे. पंखूट, खळगुल्या, घरकुली, एकुटा, खुलभुल, जळबुंदी, तुषारी अशा अनेक नव्या शब्दरूपांचा वापर वाचकांच्या हृदयापर्यंत नेमकेपणाने अर्थ पोचण्यासाठी त्या करतात. त्यांची कविता व्यामिश्र आहे, पण जटिल, दुर्बोध नाही, दुःख आहे, पण कटुता वा विखार नाही. अत्यंत तरल अबोध, अमूर्त अशा भावानुभूतींना नेमक्या तपशीलांनी तंतोतंत साकारण्याची कुशल चितार्याची कला त्यांच्यात जात्याच आहे.
भावकवितेचे काही चांगले गुण त्यांनी आत्मसात केले. प्रेमभावनेचा उत्कट आविष्कार, निसर्गाशी नाते, अकृत्रिम लयबध्दता, छंद, जातीचा वापर यातून त्यांची कविता मुक्तपणे आविष्कृत झाली, म्हण्ूनच त्यांची कविता आजही जुनी वाटत नाही. नवकवितांच्या संभारात त्यांचा ताजेपणा अजूनही टिकून आहे