TheOped

TheOped विविध अनुभवांची मनावर उमटणारी स्पंदने शब्दबद्ध करण्याचे हे व्यासपीठ आहे.

02/01/2022

TheOped पेजच्या वाचकांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !

27/06/2021

तुम्हारा फ्रिज फ्रिज!! मेरा फ्रिज क्या?

- शुभा प्रभू साटम

तुमचा फ्रिज उघडला की कसा दिसतो ? विचारायचे कारण असे की एक छोटा व्हिडिओ बघत होते. फ्रिज कसा नीटनेटका ठेवावा हे दाखवणारा..ती माऊली फ्रिज कसा ऑर्गनायइज्ड ठेवते ,कसे सगळे सुबक रचते असे !

तर तिने काय केले?

खेचायचे लांबट ट्रे घेतले ,त्यात पाकिटबंद वस्तू,मसाले,सीरिअल्स (कॉर्न फ्लेक्स मुसली ) मग प्लास्टिक zip lock पिशव्यात आधीच पॅक असणाऱ्या भाज्या,हिरवे फिरंगी मसाले, फळे..नंतर तसेच प्याक बंद खाणे ,दूध,दही सॉरी योगुर्ट. जाहिरातीत पण फ्रिज असाच सुबक नीटनेटका असतो ना? काचेच्या पारदर्शक वाडग्यात पास्ता,डाळ,बटाटा भाजी असे पदार्थ, (अंबाडी ,कारली अळूची भाजी यांना ठाऊकच नसावी) आयिस्क्रिम..एकच सफरचंद,एकच डाळिंब .भाज्या ट्रे मध्ये चार टोमॅटो,एक फ्लॉवर दोन वांगी, दोन पालक जुड्या अर्धा पाव मटार आणि एखादी शिमला!!!

मला सांगा अस्सल भारतीय घरात ,आणि इथे मी दोन मुले, आई वडील, झालेच तर आजी आजोबा अशी family गृहीत धरली आहे,शोना बाबू नाही.
शक्य आहे का?

सर्वसाधारण भारतीय फ्रिज मध्ये काय असते?

कोणताही फ्रिज असो,दिल्ली,केरळ मेघालय,कोलकाता की मुंबई..एक गोष्ट असणारच, दुधाचा टोप किंवा भांडे.आजही ९९% भारतीय घरात दूध उकळून त्याची साय विरजण म्हणून साठवली जाते.जिला जीवापाड जपतात.तर दुधाचा टोप,आणि लॉकडाऊन नंतर तर प्रसंगी पाच पाच लिटर दूध.घरी लावलेले दही,सायीचे विरजण, बटर,चीझ(आम्ही डी मार्ट मधून सगळे एकदम आणतो हां) .इथे एक कप्पा खल्लास !

मग दुसरा कप्पा..त्यात काय?

भिजवलेले पीठ/कणीक,इडली डोसा पीठ,चिरलेला कांदा, पनीर,उरलेला भात,आमटी, भाजी,चटणी,(कितीही कमी करा,चटणी उरतेच)हे सर्व किंवा यातील काही.यात दुसरा कप्पा समाप्त.

तिसरा कप्पा.
रवा,इडली रवा,मैदा,शेंगदाणे कूट,कडवे वाल(सुकवणार कुठे आणि lockdown आहे)असे.मग फळे..मोसंबी(ज्यूस साठी.. लॉ डा आ.),द्राक्षे,पेरू,कापलेले कलिंगड,पपई,अर्धा उघडलेला ब्रेड ,उरलेला केक !
आता भाजी ट्रे

वॉशिंग मशीन मधून धुवून निर्जंतुक करायच्या(Covid काळातील नवी जबाबदारी),त्यात बसायला हव्यात, म्हणून रग्गड घेतलेल्या भाज्या..
कोबी, फ्लॉवर ,वांगी, दुधी भोपळा अश्या. प्रशस्त आणि जागा व्यापणाऱ्या.स्वस्त आहे आणि आलोच तर घेवून टाकू ,Lockdown आहे म्हणून घेतलेले अर्धे पिक्के अर्धे कच्चे टोमॅटो,कोथिंबीर,आले ,मिरच्या,गवती चहा,झालेच तर तोंडली,सुरण,वांगी,ठेमसे,रताळी.

आता फ्रिज दार..

त्यात आम्ही फक्त तांब्याच्या भांड्यातले,मातीच्या ग्लास मधून पाणी पितो ..म्हणून घेतलेल्या तांबा /मातीच्या वजनदार बाटल्या..फ्रिज मधील पाणी नको, म्हणून त्यात आता लिंबू सरबत,आले+ गवती चहा+लवंग यांचे पाणी ,सॉरी काढा,हंगामानुसार पन्हे,गाजर कांजी,असे काही.झालेच तर एखादी अर्धी संपलेली वाईन,दोन दोन डझन अंडी(lockdown आहे,आता हे पलुपद लॉ डा आ असे वाचावे) पास्ता, pizza सॉस,सोय रेड आणि ग्रीन चीली सॉस सेझ्वन चटणी,केचप, मेयॉनिज,झालेच तर पिझ्झा गेल्या महिन्यात मागवला होता त्याचे मसाले आणि केचप पिशवी+इन्सुलिन इंजेक्शन.. काही गोळ्या इत्यादी.फ्रिजर मध्ये ओले+ सुके खोबरे,सुका मेवा(कोबिड lockdown इत्यादी ).. ,थंडीत स्वस्त मिळालेला म्हणून सोलून ठेवलेला मटार,पावटा,आमरस,नॉनव्हेज असल्यास मासे,चिकन, आइस्क्रीम,आणि हौशी धोरणी सुगरण(कॉलर ताठ करण्याचा ईमोजी मेल्या व्हॉटसअप कडे आहे का?मरो,मला डोळ्यासमोर आणा बरं!) असतात त्यांच्या फ्रीजमध्ये तर उंधियु पासून फणसाची कुयरी ते उकडलेल्या पास्त्यापर्यंत काहीही असू शकते.

सामान्य भारतीय घरातील फ्रिज असाच असतो.तुमचा नसेल तर...
१ तुम्ही खूप हुशार आणि टापटीपीच्या आहात.
२ तुम्ही एकट्या राहताय..
असो,आता मला सांगा हे विश्व सुबक कसे रचावे?

एकतर भारतीय अन्न आणि सवयी, यानुसार आजही फ्रिज रचना नसते.खोटे वाटतेय?
आपला गंज असतो पहा, ताक किंवा आमरस ठेवायचा,किंवा कढीचा कावळा (दिसतच नाही हल्ली) या दारातील कप्प्यात ठेवून दाखवा बरे ! किंवा लोणच्याची बसकट बरणी,तुपाचा डबा! नेहमीच्या कप्प्यात मोठा उंच टोप ,बसकट कढई..यांना बसवायला ट्रे काढावे लागतात.हे मोठे टोप कढई का? असला प्रश्न विचारू नका.आजही आमच्याकडे सरकारी नियम पाळून, सणवार,भिशी,हॅप्पी बड्डे होतात.आम्हाला नाही हो असे माणसापासून वेगळे राहता येत.चार माणसे आलीच पाहिजे.

बर मुद्दा होता दूध दुभत्याचा ,दूध तापवून, सायीचे विरजण ,घरी केलेलं तूप हे फक्त भारतीय मक्तेदारी आहे.चीतळ्यांचे तूप कितीही चांगले असेल, तरी सण वाराला आम्हाला घरचे लोणकढे तूप हवेच.भारतात पाव लिटर दूध घ्या किंवा पन्नास लिटर..ते पहिल्यांदा खरपूस तापवले जाणार म्हंजे जाणार.आजही त्या खोक्यातील किंवा कॅन मधील दूध भारतीय माणसाला पटत नाही.आंब्याच्या मोसमात आमरस काढून तो फ्रीजर मध्ये ठेवला गेला नाही असे मराठी घर विरळा.

आपल्या भाज्या पण कश्या?

सुरण,भोपळा,वांगी,रताळी अश्या आडव्या तिडव्या..त्यात एक सुबक शिमला आणि दोन चेरी टोमॅटो कसा रुचेल आणि बसेल? लॉ डा आ म्हणून घरोघरी अधिक भाज्या घेणे तर प्रचंड वाढले आहे. बरं फ्रिज आम्ही ठेवू सुबक, पण ती एकसारखी भांडी आणि डबे कुठून आणायचे??

दुधाच्या पिशव्याना उदबत्तीने भोके पाडून त्यात कोथिंबीर, मिरच्या ,आले लिंबू साठवायची सवय आम्ही हल्ली हल्ली मोडलीय.आणि हॉटेल मधून आलेले ,किंवा श्रीखंडा चे प्लास्टिक डब्बे धुवून ते वापरू लागलोय.एकसारखे असायला हवे हा आचरट पणा आम्हाला नाही हा परवडणार..
मुद्दा काय,की फ्रिज चे डिझाईन भारतीय कुटुंब,राहणीमान सवयी याला उद्देशून केले जात नाही.इथे बरेचदा किलोच्या हिशेबात अन्न शिजवले जाते.अनेक भारतीय कुटुंबे आजही कमीतकमी चार जणांची असतात. उठ सूट बाहेरचे जेवण खाणे मागवणे फार रुचत नाही, आणि साड्या, कपडे सोडा,किराणा सामान,भाजी,फळे यांची घाऊक खरेदी हा भारतीय मनाचा पक्का आत्मा आहे.वो बचत को तुम क्या जानो बॉस!

आता हे विश्व कसे सामावेल?

आणि जरी ठेवले तरी ते आटोपशीर कसे बरे दिसेल सांगा बरे?

(लेखिका या खाद्यसंस्कृतीच्या अभ्यासक आणि मुक्त पत्रकार आहेत.)

26/06/2021

...पुढचे 3 महिने तू काहीही व्यायाम करायचा नाहीयेस !

- मुक्ता गडणीस
...."आणि, पुढचे 3 महिने तू काहीही व्यायाम करायचा नाहीयेस हं"
"छे, 3 नाही, मी तर म्हणते 6 महिने तिने काहीही व्यायाम करायला नकोय...."

कोविड झाल्यावर जेवढी झाली नव्हती तेवढी हे सततचे सल्ले ऐकून मीरा हवालदिल झाली... कधी एकदा ह्या कोविडच्या अशाक्तपणातून बाहेर येते आणि सकाळी उठून पाळायला जाते असं तिला झालं होतं. पण आता नेमकं काय करावं ह्या विचाराने ती ग्रासून गेली...

थोड्याफार फरकाने कोविड मधून बाहेर पडलेल्या प्रत्येकाची अशीच द्विधा मनःस्थिती हल्ली झालेली दिसतेय.

तर, कोविड मधून बऱ्या झालेल्या सर्वांना काही साध्या सुध्या पद्धतीने स्वतःच्या शरीराचे परीक्षण करता येणं शक्य आहे. जसं की हिमोग्लोबिन, कोलेस्टेरॉल प्रोफाइल, डॉप्लर, लिपिड प्रोफाइल, कारडीओग्राम, C प्रोटीन रिऍक्टर इ चाचण्या करून घेणं. त्यावर डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्यांनी व्यायाम करण्यासाठी हिरवा कंदील दाखवला तरी पूर्वी करत होता त्याच तीव्रतेने व्यायाम चालू न करता हळू हळू सुरुवात केलेली बरी.

त्यासाठी एक सोपी पद्धत आहे.

रेस्टिंग heart rate ह्या आजारपणात नक्कीच वाढतो. आपला पूर्वी तो किती होता हे जर माहीत असेल तर दोन्हीची तुलना करायची आणि त्यातील तफावत कमी करण्याचा हळू हळू प्रयत्न करायचा. जर तो लक्षात नसेल तर आत्ताचा जो आहे तो आधारभूत धरून हळू हळू खाली आणण्याचा प्रयत्न करायचा. व्यायाम करताना तुमच्या रेस्टिंग heart रेट च्या 60-70 टक्के जास्तीत जास्त तो वाढेल एवढ्याच तीव्रतेचा व्यायाम झाला पाहिजे आणि त्या वाढलेल्या हार्ट रेट झोन मध्ये फक्त 1/2 तास व्यायाम झाला पाहिजे. त्यापेक्षा जास्त वेळ व्यायामाचा कालावधी नसावा. (रेस्टिंग हार्ट रेट- सकाळी जाग आल्यावर काहीही हालचाल न करता आपला जो हार्ट चा रेट असतो तो म्हणजे रेस्टिंग हार्ट रेट)

आपण सगळेच जाणतो की कोविड चा सगळ्यात जास्त दुष्परिणाम फुफ्फुसे आणि हृदय ह्या दोन अवयवांवर होतो त्यामुळे फुफुसांच्या बळकटीसाठी प्राणायाम केल्याने फायदा होईल. ह्या व्यतिरिक्त आपल्या रोजच्या खाण्यात एक संपूर्ण टोमॅटो किंवा थोडे कलिंगड खावे. त्यातील लायकोपीन नावाचे रंगद्रव्य फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढवण्यास मदत करते. ज्यांना कोलेस्टेरॉलचा त्रास आहे, त्यांनी शक्यतो मांसाहार काही दिवस टाळावा. दररोज एक संपूर्ण आवळा किंवा 5 ग्राम आवळा पावडर खाल्ल्यास कोलेस्टेरॉल कमी होण्यास मदत होऊ शकते. नायट्रिक ऑक्साईडमुळे आपल्या रक्तनलिका प्रसरण पावतात व त्यामुळे रक्ताचे वहन जास्त प्रमाणात होऊन शरीराला ऑक्सिजन मोठ्या प्रमाणात पुरवला जातो. बिटमध्ये मोठ्या प्रमाणात नायट्रिक ऑक्साईड आहे त्यामुळे बिटचा समावेश जेवणात नक्की असावा.

ह्या व्यतिरिक्त इतर शारीरिक प्रणालींना बळकटी दिल्यास हृदय व फुफ्फुसे ह्या दोन अवयवांवरील भार अप्रत्यक्षपणे कमी होऊ शकतो. उदाहरणार्थ, मी जर चालण्याचा व्यायाम करत असेन, तर त्या हालचालीत भाग घेणारे सगळे स्नायू बळकट असतील, तर ती हालचाल करण्यासाठी मला कमी शक्ती लावावी लागेल, मला चालणे सोपे जाईल, चालणे सोपे झाले की माझ्या फुफुसंवारील आणि हृदयावरील भार आपोआप कमी होईल.... जर माझ्या शरीरातील स्नायूंमध्ये पुरेशी शक्ती नसेल तर मी नुसता प्राणायाम करून उपयोग होणार नाही. स्नायूंना बळकटी व्यायामानेच मिळते. त्या शिवाय आहारात प्रथिनांचे (protein) प्रमाण पुरेसं असलं पाहिजे, नाहीतर व्यायामदरम्यान तुटलेल्या स्नायूंच्या तंतूंची पुनर्बांधणी होत नाही. प्रत्येकी 1 किलो वजनाला कमीत कमी 1 ग्रॅम प्रथिन हे प्रमाण Indian Council of Medical Research ह्यांनी प्रमाणित केलेले आहे. शरीराची प्रथिनांची गरज मांसाहारी व्यक्तींना पुरी करणं थोडंफार तरी शक्य असते परंतु शाकाहारी व्यक्तींनी आपल्या रोजच्या अन्नात उसळी, डाळी व इतर प्रथिन युक्त अन्नाचे सेवन वाढवावे. अंडी हा प्रथिनांचा उत्तम स्रोत होय.

कोविड मध्ये आपल्या पचन संस्थेवर देखील दुष्परिणाम होतो. आपल्या शरीराची 70% प्रतिकारशक्ती आपण काय खातो ह्यावर बांधली जाते. चांगल्या प्रतीचे घरी शिजवलेले अन्न खाणे कधीही उत्तमच ! कोविड नंतर कमी साखरयुक्त आणि कमी तेलकट अन्न खाणं श्रेयस्कर आहे. त्यामुळे तुमच्या आतड्यांवरील भार कमी होऊन अन्नातील पोषकद्रव्यांचे चांगल्या पद्धतीने शोषण केले जाते. आपल्या रोजच्या आहारात विविध रंगी भाज्या आणि फळांचा समावेश केल्यास त्यातील विविध रंगद्रव्यांमुळे आपली प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. उदा. पिवळी व लाल ढोबळी मिरची, जांभळा कोबी, जांभूळ, तुती, टोमॅटो, बिट, गाजर इत्यादी. अशापद्धतीने पचनसंस्थेची कार्यक्षमता वाढली की प्रतिकार शक्ती वाढते आणि फुफुसे आणि हृदय ह्यांवरील भार अप्रत्यक्षपणे कमी होतो.

ह्या सगळ्यांव्यतिरिक्त कोविड आणि त्यानंतरच्या काळात मानसिकतेवर मोठा घाला होतो. कोणत्याही प्रकारचा व्यायाम केल्यानंतर एन्डोर्फीन नावाचा हार्मोन स्त्रवतो जो आपल्याला आनंदी बनवतो. डॉक्टरांनी व्यायामाची परवानगी दिली तर रोज न चुकता थोडा व्यायाम करणे आणि ध्यानधारणा करणे मानसिकदृष्ट्या नक्कीच उपयुक्त ठरते आणि अर्थातच हृदयावरील भार कमी होतो.

ह्या सगळ्यावरून आपलयाला असे लक्षात येईल की, एखाद्याला कोविड ची लक्षणे दिसली तर त्याने तडक डॉक्टरांकडे जाऊन योग्य ते औषधोपचार घ्यायला हवेत आणि त्यातून बाहेर आल्यावर योग्य व्यायाम आणि त्याच्या जोडीला योग्य आहाराची सांगड घालून देणाऱ्या हेल्थ कोच ची मदत घ्यायला हवी. आपल्या शरीराची कोविड नंतर (अर्थात कोविड झाला नसेल तरी) आपल्याला जास्त काळजी घेणे गरजेचे आहे हे आता आपल्या सर्वांना कळून चुकले आहे. कोविड झाल्यानंतर 14 दिवस विलगिकरणातुन बाहेर आल्यावर 15 व्या दिवशी आपलं शरीर पूर्ववत झाले आहे आशा भ्रमात कोणीही राहत कामा नये. जे रुग्ण कोविड मधून बाहेर आलेले आहेत ते आणि ज्यांना आपल्याला कोविड (किंवा दुसरा कुठलाही आजार) होऊ नये असे वाटत असेल तर आत्तापासूनच शरीराची योग्य काळजी घेणं हे १००% आपल्याच हातात आहे.

आपणा सर्वांनाच उत्तम प्रतीची फळे चाखायला आवडतात पण जमीन कसण्यापासून त्याला फळ येईपर्यंत शेतकरी ज्या कष्टाने आणि निगुतीने काळजी घेऊन आपल्याला उत्तम फळ पुरवतो तेवढ्याच कष्टाने आणि संयमाने आपण आपले शरीर कसले तर ते आपली चांगली साथ देईल. आपण आपल्या गाडीची मशागत करायची असल्यास किंवा बिघडली असल्यास तडक मेकॅनिक कडे घेऊन जातो पण आपल्या शरीराच्या बाबतीत मात्र आपले आपणच उपाय करत राहतो. आपल्या शरीराच्या बाबतीतच एवढा निष्काळजीपणा कशासाठी???

(लेखिका रनर आणि लाईफस्टाईल कोच आहेत.)

26/02/2021

ट्रिपल फिल्टर

- शिल्पा केळकर

मी झोपेतून जागी होत किलकिले डोळे उघडते. खोलीत आणि बाहेरही धूसर प्रकाश. पहाट की संध्याकाळ याचा मागमूसही न लागू देणारी संदिग्ध वेळ. खिडकीबाहेर माणसाच्या अस्तित्वाच्या खुणा. उंच इमारती. शहरातल्या प्रखर दिव्यांचा प्रकाश. लांबवर पसरलेल्या वस्तीचे लुकलुकणारे दिवे. मी अंटलांटात आहे की मेक्सिकोत? की सिंगापोरमधे? मी डोक्याला ताण द्यायचा प्रयत्न करते. बाहेर दिसणार्‍या दृश्यावरून काहीच अंदाज नाही बांधता येत. सारेच जिनेरीक. हे कुठल्याही देशातले, कुठल्याही गावातले असू शकते. आणि असेल कुठलेही, तसा फरकही काही पडणार नसतो. जगभर एकसारख्या छापाची काँक्रीटची गावे-देश बनवणारे बिल्डर्स. एकसारख्या मापाचा मेंदू बनवणारी विद्यालये. एकसारख्या साच्याचे कामगार बनवणारे व्यावसायिक जग. या तीन फिल्टरमधून जे उरेल त्याने बनणारा समाज. स्वतःचा चेहरा हरवलेली गावे आणि माणसे. कुठेही गेले तरी परके वाटू नये. हेही तसे बरेच म्हणायचे.

मी माझी खिडकीबाहेर ताणलेली नजर आत वळवते. खोलीतही काही फारसे वेगळे नसते. मॅरिएट हॉटेल. जगभरात कुठेही असो. खोलीची मांडणी मात्र एकसारखीच. तसाच सोफा. दिवे. टिव्ही. कामाचे टेबल-खुर्ची. पलंगाची जागा. नाईटस्टँड. बाथरूममधल्या साबण-शाम्पूची कंपनीही तीच. भिंतीवरले फोटोही एकाच पध्दतीचे. कशालाच स्थानिक स्वाद नाही. ज्या जागी रूजलोय त्याचा अभिमान नाही. आजूबाजूच्या वातावरणाचा आदर नाही. हेही सारे बिनचेहर्‍याचेच. पण हिच तर या हॉटेलची खासियत. त्यासाठीच तर हे माझ्यासारख्या व्यावसायिक प्रवाश्यांच्या आवडीचे. जगाच्या पाठीवर कुठेही गेलोतरी साबण मात्र तोच मिळावा हा अट्टाहास असलेले. कामासाठी घरापासून दूर येणारे. आणि या परिचित एकछापी-एकसूरीपणात दिलासा शोधणारे.

सार्‍या खोलीभर मी परत नजर टाकते. अतिपरिचयाने माझे डोळे त्या वस्तूंना सरावलेले असतात. मी त्यांना पाहाते आहे की त्या मला? मी संभ्रमात पडते. हळूहळू ती भिंतीवरची फोटोफ्रेम माझ्या डोळ्यातून मलाच पाहाते आहे असे वाटू लागते. तो दिवा, तो टेलीफोन. नाईटस्टँडवरचे अलार्म क्लॉक. सगळ्याच वस्तू मला बघू लागतात. मी डोळे मिटून घेते. "मी माझी मी तरी कशी दिसते?", म्हणून मीही त्या सार्‍यांबरोबर मला पाहू लागते. पण मला "मी" सापडतच नाही. सापडतात त्या सार्‍या प्रतिमा. दुसर्‍याने बनवलेल्या. लोकांच्या माझ्याकडून असलेल्या अपेक्षा, त्यांची माझ्याबद्दलची मते. माझ्या फाईलची ही अशीच कितीतरी पाने. आणि त्या सार्‍याने बनलेली मी. यातून गाळून जे काही उरेल तोच का माझा आत्मा? यातलं एकजरी पान निखळलं तरी माझा आत्मा उडून जाणार? यातल्या एकानेही माझ्याबद्दलचे मत बदललले तर मी माझे अस्तित्व हरवून जाणार? मी ती सारी पाने फाडून टाकून बाजूला करण्याचा प्रयत्न करते. आणि एकदम रिकाम्या झालेल्या त्या फायली कडे मला बघवतच नाही. काहीच नाही आत? शून्य? मग "मी" म्हणजे काहीच नाही? की, मी म्हणजे, मला दुसरे काय म्हणतात तीच मी आहे? मग इथे या पलंगावर आहे तरी कोण? फेसबुकरच्या मित्र-मैत्रिणींच्या अभिप्रायांचा एक ढीग? मी फाईल बंद करून टाकते. "बघूदे त्या फोटोफ्रेमला माझ्याकडे" असं म्हणत मी उशीत डोके खूपसून डोळे मिटते.

अहाहा! त्या इजिप्शीअन कॉटनच्या १००० थ्रेड काऊंट असलेल्या बेडशीटच्या मऊशार स्पर्शाने माझी मरगळ निघून जाते. ही तर मॅरीएटची एकदम सिग्नेचर बेडशीटस्. त्याचा मऊ आणि थंड स्पर्श मला काही काळ का होईना इजिप्तला कापसाच्या शेतावर घेऊन जातो. कापसाचा धागा जेवढा लांब तेवढे त्याचं स्पिनींग जास्त चांगलं. ते गोळा होत नाही. आणि हा इजिप्तमधला कापूस तसा लांब धाग्याचा. अ‍ॅरिझोनामधे उगवणारा पिमा कापूसही तसाच. पण अ‍ॅरिझोनाच्या मॅरिएटमधेही इजिप्तमधल्या कापसाची बेडशीटस्.
माझ्यासारख्या चोखंदळ प्रवाशाला काडीचाही (का धाग्याचाही?) फरक जाणवू नये म्हणून? खरं तर स्पिनिंग, वीव्हींग आणि डाईंग या ट्रिपल फिल्टर मधून गेल्यावर खरंच काही फरक पडत असेल का? या कापसाचे किती कापूसपण पोचत असेल माझ्यापर्यंत? त्याचे खरे मऊपण अनुभवयाचे असेल तर मला कापसाच्या झाडाखालीच जाऊन मुक्काम ठोकावा लागेल का? तिथे जाऊन मला तो खरा कापूस मऊ-थंड लागलाच नाहीतर? छे, छे. त्या गैरसोयीच्या कल्पनेनही माझ्या अंगावर काटा येतो. मी १००० थ्रेडवाली ट्रिपल फिल्टर्ड चादर नीट ओढून घेत परत झोपेच्या आधीन होते.

खर्र-खर्र आणि मग पाणी उकळल्याचा आवाज. त्यामागोमाग कॉफीचा अतिशय हवाहवासा वाटणारा कडवट उग्र दर्प. हॉटेलच्या खोलीतला, टायमरवर लावलेला कॉफीमेकर सुरु होतो. एकूण तीन गजर. पहिला कॉफीचा वास नाकातून शिरून माझ्या मेंदूला उत्तेजित करणारा. मग माझ्या फोनवर सुरु होणारे हळूवार संगीत. कानावर पडून जोजवत रहाणरे. मग अलार्मक्लॉकचा कर्कश्श आवाज. अंगावर अगदी काटा आणणारा. हे असे एकामागोमाग टप्प्याटप्प्याने जागे होत राहाणे. चार देह, पाच प्राण-कर्मेंद्रिये-ज्ञानेंद्रिये या सगळ्याने मिळून बनलेली मी एकच आहे नं? प्रत्येकाचा कार्य वेगळे पण सर्वांचे साध्य एकच. पण मग हे असे सारे वेगवेगळे जागे होणे का? का ह्या सार्‍यापासून मी कोणी वेगळी आहे? तीच का ती, जी बाकीचे सर्व झोपी गेले तरी जागीच राहाते आत?

कोलंबिअन ट्रिपल फिल्टर्ड कॉफीचा सुवास आता सार्‍या खोलीभर दरवळू लागतो. अँडीजच्या पोटात उगवलेली अरेबिका बर्बन. पर्वताच्या पोटात मर्यादीत जागेत असलेल्या हवेचा पुरेपूर फायदा उठवत कॉफीच्या झाडांनी निर्माण केलेलं हे स्वप्न. जगभरातल्या लाखोंची झोप उडवणारं. तसंच ते माझीही झोप उडवते. उठून तो गरमागरम द्रव मी कपामध्ये ओतते. आणि ओठाला लावते. त्यातले कॅफीन माझ्या नसानसातून झिरपत मला तरतरीत करते. ही तरतरी, अशी उत्तेजना, हिच त्या झाडाला अभिप्रेत असेल का? त्या तपकीरी द्र्वात मला कॉफीच्या झाडावरच्या पिकलेल्या बेरीज दिसू लागतात. त्यांचे पिकलेपण बरोबर ओळखून तोडणारे हात. मग त्यांना भाजल्यावर होणारा त्यांच्यातला रासायनिक बदल. आणि कॉफी ब्रू करता यावी म्हणून त्यांचे शेवटी केली जाणारी पूड. ह्या ट्रिपल फिल्टर प्रक्रियेत ते झाडाला अभिप्रेत असलेले खरे कॉफीपण उरले असेल का? गरमागरम कॉफीच्या एका कडवट आणि दीर्घ घोटाबरोबर मी तो विचार गिळून टाकते.

आता मात्र कामाला जायची वेळ होत आलेली असते. लॅपटॉप उघडून सकाळच्या प्रेझेंटेशनची तयारी. एकाछापाच्या पॉवरपॉईंटच्या स्लाईडस. त्यांचं अगदी एका साच्यातलं आखीव प्रेझेंटेशन. थोडं फार बदलवून , या आधीच्या क्लाएंटकडंही हेच सांगितलेलं आणि यापुढच्याही हेच सांगितलं जाणार. सर्व माहीती नीट शब्दांकीत केलेली. ही माहिती लिहीणार्‍याला आधी आतमधे स्फुरली असेल. मग त्यातला काही अंशच त्याच्या मनात उतरला असेल. मग त्यानं ते शब्दांकीत करताकरता त्यातले कितीतरी मागेही राहिले असेल. असे हे ट्रिपल फिल्टर्ड ज्ञान. आता ते मी जाऊन कोणालातरी सांगणार. माझे शब्द, त्यातलं जितकं पोचवता येईल, तेवढंच पोचवणार. मग ऐकणारा त्याला जेवढं पकडता येईल तेवढंच घेणार. आणि मग त्याच्या आत ते कुठेतरी मुरणार. ते मुरलेले आणि मूळ लेखकाला स्फुरलेले एकसारखेच असेल का? का त्यात जमिनअस्मानाचा फरक असेल?

प्रेझेंटशनची तयारी पूर्ण होते आणि मी कामाला निघते. आता त्या कोलंबिअन ट्रिपल फिल्टर्ड कॉफीने मला पूर्ण जागे केलेले असते. अँडीजच्या पोटातले ते काळे गूढ रहस्य आता माझ्या पोटात शिरलेले असते. इजिप्शीयन कॉटनच्या लांब धाग्यांचा चिवटपणाही माझ्यात आलेला असतो. डोक्यातले विचार, सॉक्रेटीसच्या "ट्रिपल फिल्टर" परीक्षेच्या, "उपयुक्तता" या शेवटच्या टप्प्यात नापास होतात. मग मी त्यांना बाजूला सारते. यूव्हिए-यूव्हिबी फिल्टर्स असलेला काळा चष्मा डोळ्यावर चढवते. स्वतःचा वेगळाच रंग असलेल्या त्या काचा मला त्यांच्या फिल्टर्ड नजरेतून "रिअल लाईफ इमेज" अनुभव देण्यास सज्ज होतात.

...देवकीनंदन गोपाळा !- भारतकुमार राऊत"तीर्थी धोंडापाणी देव रोकडा सज्जनी |" असा क्रांतिकारक मंत्र सांगत मूर्तिपूजा, अंधश्...
23/02/2021

...देवकीनंदन गोपाळा !

- भारतकुमार राऊत

"तीर्थी धोंडापाणी देव रोकडा सज्जनी |" असा क्रांतिकारक मंत्र सांगत मूर्तिपूजा, अंधश्रद्धा, सावकारी कर्ज, नशापाणी याविरुद्ध जनजागरण करणारे महाराष्ट्राचे आधुनिक संत गाडगे महाराज यांचा आज जन्मदिन. त्यांना विनम्र श्रद्धांजली .
विदर्भातील अंजनगावात १८७६ साली जन्मलेले डेबुजी झिगराजी जानोरकर पुढे संत गाडगे महाराज झाले. त्यासाठी त्यांनी कोणतेही चमत्कार केले नाहीत. उलट चमत्कारांवर विश्वास ठेवू नका, असेच ते सांगत राहिले.

गाडगे बाबांचा वेष बावळा. चिंध्या शिवून केलेले कपडे, वाढलेल्या दाढीची खुरटे, डोक्यावर अर्ध्या फुटक्या मडक्याची टोपी, हातात झाडू, अशा अवतारात गाडगे बाबा हयातभर गावागावात फिरत राहिले, लोकांना ग्राम स्वच्छतेचे महत्व पटवत राहिले.

सकाळी गावाची सफाई व संध्याकाळी झाडाच्या पारावर प्रवचन अशी त्यांची दिनचर्या असे. 'गोपाळा गोपाळा देवकी नंदन गोपाळा' असे गात गात ते रसाळ वाणीत प्रवचन करीत. नशाबंदी, हुंडाबंदी, अंधश्रद्धा विरोध, शिक्षणाचा प्रसार अशा विषयांवरील त्यांची प्रवचने ऐकण्यास आसपासच्या गावांतूनही लोक प्रचंड गर्दी करत.

प्रवचनानंतर लोक त्यांना पैसे देत. काही श्रीमंत मोठाल्या देणग्याही देत. हा सर्व निधी बाबांनी सार्वजनिक कामासाठीच वापरला. गावागावात व छोट्या-मोठ्या शहरांत त्यांनी धर्मशाळा बांधल्या, दवाखाने, व्यसन मुक्ती केंद्रे उभारली व शाळाही काढल्या.

महाराष्ट्रातील संतपरंपरेचे वर्णन ‘ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस’ असे केले जाते. संत गाडगेबाबांच्या कार्यामुळे - ‘या भागवत धर्माच्या कळसावर गाडगेबाबांनी २० व्या शतकात कर्मयोगाची ध्वजा चढवली’, हेच खरे.
'महाराष्ट्रातील समाजवादाचे प्रचंड व्यासपीठ’, असे यथार्थ उद्गार आचार्य अत्रे यांनी संत गाडगेबाबांबद्दल काढले. लोकसेवेच्या या धकाधकीच्या प्रवासातच त्यांचे अमरावती जवळ वलगाव येथे पेढी नदीच्या पुलाजवळ २० डिंसेंबर १९५६ रोजी देहावसान झाले.

देऊळातील देवाला न मानणारा व तरीही संतपदाला पोहोचलेला हा महात्मा कायमचा निघून गेला.

(लेखक हे ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

12/02/2021

गौरी देशपांडे : बहुपेडी साहित्यिक

- अवंती कुलकर्णी

मराठी साहित्यात कथालेखनाला, ललितलेखनाला विशेष असं स्थान आहेच, परंतू त्यातही स्त्री कथा-ललितलेखकांच्या साहित्याने त्यात जी मोलाची भर घातली आहे ते अधिक महत्त्वाचं आहे. या साहित्यात पुरुषप्रधान जगात जगत असताना स्त्रियांचं असणारे स्वतःचं असं निराळं विश्व, स्वतःचं आयुष्य, आयुष्याकडं पहाण्याचा त्यांचा दृष्टिकोन, त्यांच्या दैनंदिन जगण्यात असणाऱ्या समस्या, त्या समस्यांचं त्यांच्या परीनं होत जाणारं आकलन, निराकरण, स्वतःचे आनंद, अस्तित्वाचा-स्वत्वाचा शोध घेणं, नातेसंबंध यांसारख्या अनेक गोष्टींबद्दल या कथा ललित लेखनांत लिहिलेलं दिसून येतं. विसाव्या शतकातील मराठी साहित्याचा जेव्हा विचार केला जातो तेव्हा त्यात तत्कालिन आधुनिक स्त्रीवादाची बीजेही दिसून येतात. आणि जेव्हा या प्रकारच्या साहित्यविषयावर बोललं -लिहिलं जातं तेव्हा गौरी देशपांडे हे नाव येणं, गौरी देशपांडेचं लेखन, तिच्या लेखनाचं झालेलं विवेचन इत्यादी एक अपरिहार्य टप्पा आहे.

कविता, दिर्घकथा, कथा, ललितलेखन, भाषांतरं अशा माध्यमांतून गौरीनं आपला संचार केला. त्यातही तिच्या कथा-ललितलेखनाच्या रचनात्मक बांधणीतील निराळे प्रयोग दिसून येतात. गौरीची भाषा, त्यातला ओघवतेपणा, सहजपणा, बऱ्याचदा धीट भाषा, ग्रामीण तसेच शहरी म्हणी-वाक्प्रचारांचा मुक्तपणे केलेला वापर यासाऱ्यामुळे गौरी एका ठरावीक वयातील वाचकवर्गाची अत्यंत आवडती लेखिका बनली.

शांतपणे, एकदम तबीयतसे वाचण्यासारखी तिची पुस्तकं आहेत. कोणीतरी सांगतं म्हणून आपणही वाचावं अशी ती नक्कीच नाहीत. तिची पुस्तकं वाचताना आपण खूप क्लिष्ट काही अनाकलनीय वाचतो आहे असं कधी वाटत नाही. सहज, ओघवतंच लिहिलेलं. जसं आपण बोलत असतो तसं लेखन. फार 'पुस्तकी', अति सजवलेली भाषाही नाहीच. त्यामुळे तिची पुस्तकं वाचताना मजा येते. कधी हसू येतं. कधी उत्सुकता ताणली जाते कधी अंतर्मुख व्हायला होतं.

आपल्या पोटाची जशी भूक असते तशी मेंदूचीही एक भूक असते असं मला वाटतं. आणि गौरीची पुस्तकं एका वयात ही भूक भागवणारी ठरतात .
Reading Gauri actually quenches your cerebral appetite.
"Image of the Saint in Modern English Literature" या विषयावर पुणे विद्यापिठातून संशोधन करून गौरी देशपांडेनी पीएच्डी केलं. गौरी देशपांडेचं लेखन प्रामुख्यानं मराठीत असलं तरीही तिच्या लेखनाला सुरुवात झाली ती इंग्रजीतून. 'बिटवीन बर्थस' हा तिचा पहीला कवितासंग्रह १९६८साली कलकत्तामधल्या पी. लाल प्रकाशन संस्थेकडून प्रकाशित झाला. त्यानंतर 'लाॅस्ट लव्ह' आणि 'बियाॅण्ड द स्लाॅटरहाऊस' नावाचे आणखी दोन कवितासंग्रह कलकत्तामधूनच प्रकाशित झाले. 'ओपिनियन', 'राईटर्स वर्कशाॅप मिसलनी', 'क्वेस्ट', या नियतकालिकांमधून गौरीनं१९६६ पासून लिहायला सुरुवात केली. आपल्या आईच्या मृत्यूनंतर तिच्या श्रद्धांजलीपर लिहिलेल्या लेखापासून गौरीच्या मराठी लेखनाला सुरुवात झाली. त्यानंतर १९८०मध्ये गौरीचं पहिलं मराठी पुस्तक एकेक पान गळावया हे आलं. तीन दीर्घकथा असणारं हे पुस्तक. आपल्या लेखनाबद्दल गौरी म्हणत असे "माझं लिखाण लघुकादंबरी आहे, की दीर्घकथा आहे हे मी सांगू शकत नाही. कादंबरी सुरु होते आणि थांबते, का ते मला सांगता येत नाही, म्हणून मी माझ्या साहित्याला लिखाण म्हणते."

मौज प्रकाशनगृहने काढलेल्या 'एकेक पान गळावया'ची आणि माझी भेट माझ्या वयाच्या सतरा-अठराव्या वर्षी झाली. हे असं वय ज्यात तुम्ही जे पहाल, वाचाल, अनुभवाल त्याचा पगडा, प्रभाव किंवा छाप तुमच्यावर दीर्घकाळासाठी किंवा काहीवेळा कायमस्वरुपी असते. एकेक पान...च्या बाबतीत आणि म्हणून गौरीच्या बाबतीतही हे असंच काहीसं घडलं.

कारावासातून पत्रे, मध्य लटपटीत, आणि एकेक पान गळावया या तीन दीर्घकथा किंवा लघुकादंबऱ्या या पुस्तकात आहेत. नायिकाप्रधान लिखाण हे गौरीचं वैशिष्ट्य आहेच. या पुस्तकात स्वातंत्र्याची आसक्ती असणारी नायिका, दांभिकपणाला आणि म्हणूनच छोट्या बाबतीतही कराव्या लागणाऱ्या खोटेपणाला कडाडून विरोध करणारी नायिका हे एका अंशी गौरीचं स्वतःचंच प्रतिबिंब वाटतं. कारावासातून पत्रे मध्ये ती म्हणते "मुलगे आणि मुली यात भेद करायचा नाही, जी गोष्ट सामाजिकदृष्ट्या गुन्हा नाही, ती जर एखाद्याला आपल्या बुद्धिला पटली, करावीशी वाटली तर ती करू द्यायची. कुठल्याही प्रश्नाला 'मी सांगतो म्हणून' असं उत्तर तोंडावर फेकलं गेलं नाही, त्यामुळे आम्ही सर्व मुलं आपापल्या परीनं तऱ्हेवाईक, दंगेखोर, हट्टी बनलो." कादंबरीच्या नायिकेच्या तोंडून गौरी स्वतःच बोलत असावी असे वाटते. याला कारण सामाजिक भान असणाऱ्या आणि पुढारलेल्या, खुल्या विचारसरणीचं द्योतक असणाऱ्या कुटुंबात जन्माला येऊन तिथे मोठं होणं हेही असावंच.

गौरीच्या लिखाणाला फक्त स्त्रीवादी म्हणण्यापेक्षा ते व्यक्तीस्वातंत्र्याचा पुरस्कार करणारं लिखाण आहे असं म्हणणं योग्य ठरेल. सतराव्या वर्षी मुक्त स्त्री, स्वतःच्या अस्तित्वाचा शोध घेणारी स्त्री मनावार अर्थात अनेक वर्षं गारूड करून राहिली. आणि म्हणूनच मग एकेक पान नंतर गौरीची इतरही पुस्तकं मिळवून वाचण्याची ओढ लागली. मग 'निरगाठी आणि चंद्रिके ग सारिके ग', 'दुस्तर हा घाट आणि थांग', 'तेरुओ आणि दूर काहीपर्यंत', ह्या दोन दोन लघु कादंबऱ्यांची पुस्तकं, 'मुक्काम', 'गोफ', 'उत्खनन' ह्या दोन निराळ्या लघुकादंबऱ्या, अनेक भाषांतरं सारं काही मिळवून वाचण्याची ओढ लागली. 'दुस्तर हा घाट' मधली नायिका नमू तत्वांशी तडजोड न करता, बुद्धिच्या मार्गाने जाऊन स्वतंत्रपणे मानानी जगण्यासाठी आपल्या प्राचाही त्याग करणाऱ्या बुद्धिवादी स्त्रीची प्रतीमा वाटते. तर थांग आणि मुक्काममधली कालिंदी ही आपल्या दिसण्यापासून असण्यापर्यंत सर्वच बाबतीत न्यूनगंड बाळगून, मुलगी मेल्याच्या दुःखात एकाकी कुढून, अगणित तडजोडी करून नवऱ्याबरोबर रहाणारी आणि इयन व दिमित्री या दोन निरातिशय प्रेम करणाऱ्या सोबत्यांच्या तिच्या आयुष्यात येण्यामुळं तिच्या आत्मविश्वासात, तिच्या विचारात बदल होऊन नवऱ्यापासून वेगळं राहून
एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून ती जगू लागते. तेरुओच्या प्रेमात आकंठ बुडालेली पण कुठे थांबायचं हे पुरेपूर ठाऊक असणारी झोकून देणारी पण अत्यंत विचारी, प्रॅक्टिकल नायिका आपल्याहून बरेच मोठे असणारे 'जी' यांनाही पत्रं लिहित असते आणि आपल्या मनातली आंदोलनं कळवत असते.

गौरी वाचणं हा एक निरळा अनुभव आहे असं म्हणता येईल. खूप हिंडणे-फिरणे, खूप वाचणे, खूप सिनेमे पाहणे हे मेंदूला आणि पर्यायाने विचारांना सशक्त करणारे व्यायामच आहेत. शिपबिल्डर असणाऱ्या आपल्या नवऱ्याबरोबर गौरी खूप फिरली होती. निरनिराळे देश, तिथले लोक, तिथल्या चालीरिती या साऱ्याचं तिच्या लिखाणात प्रतिबिंब दिसतं. मग ते नमू वनमाळी जातात आणि अॅलिस्टरसारखा जीवश्च मित्र भेटतो ते अॅमस्टरडॅम असूदे किंवा इयन, दिमित्री, तेरुओ भेटतात ते जपान असूदे, किंवा मग दिमित्रीचा ग्रीकदेश असूदे. गौरीच्या लिखाणात तिथले लोक, त्यांचं खानपान, त्यांचे निरनिराळे समारंभ जसंकी जपानमधला साकुरा फेस्टिवल हे सारे बारीक सारीक तपशील तिच्या लिखाणात अगदी सहजीच येऊन जातात. तिच्या कादंबऱ्यांना परदेशातील पार्श्वभूमी लाभण्याबद्दल ती म्हणते,"अमेरिका, हाॅलंड, इटली, स्पेन, इंग्लंड, स्वित्झर्लंड, जपान, कोरिया, चायना, हाँगकाँग, असा सारा जवळपास जगभर प्रवास झाला. नवरा शिपबिल्डर असल्याने परदेश प्रवास घडत राहिला. या प्रवासात बांधील नाती तुटल्यावर, नात्याचे सर्व संदर्भ तुटले असताना 'आपण कोण' ही जाणीव अधिक तीव्र झाली. स्वतःला जाणण्याची प्रक्रिया इथूनच सुरु झाली. परदेशात वावरही अर्थात अधिकच झाला त्यामुळे लिखाणाला परदेशातील पार्श्वभूमी लाभली असावी."

गौरी ज्या प्रमाणे देशीविदेशी फिरली त्याप्रमाणेच तिचं वाचनही अफाट असल्याचं, तिचं साहित्य वाचल्यानंतर समजतं. इलियट, ग्रॅहम ग्रीन, इशवूड, यांच्या साहित्याचा गौरीने अभ्यास केला होता. गौरीच्या वाचनाचे संदर्भ तिच्या लेखनातून येत राहतात, मर्ढेकर, पु. शि. रेगे, किट्स, शेक्सपियर, वर्डसवर्थ, ऑस्कर वाईल्ड, इ. इ.त्याचप्रमाणे गौरीने वर्ल्ड क्लासिक संगीतातही रुची दाखवल्याचं तिच्या लेखनातून समोर आलं आहे, बाख, मोत्सार्ट, विवाल्डी, कुमार गंधर्व, लुईस् इ. इ. चित्रकलेतही तिला काहीसा रस होता हे हुसैन, जहांगीर सबावाला, इ.इ. आणि सर्वामुळे तिला पाश्चात्य साहित्य, संगीत, यांमधे रुची आणि गती होती हे समजतंच पण त्याचं पुरेपूर आकलन होऊन तिच्या लिहिण्यात ते तिनं आणल्याचं दिसून येतं. तिचं वाचन अफाट होतं. आणि ते तिच्या लिहिण्यातून आपल्या समोर आलेच आहे. पाश्चिमात्य आचारविचारांचा तिच्या वागण्यावर खूप प्रभाव होता. हेही तिच्या लिहिण्यातून जाणवतेच. पण असं असतानाही तिच्या लिखाणात 'मध्यमवयीन, साधारण कुटुंबात वाढलेली वरवर सामान्य अशी भारतीय स्त्री' हे मध्यवर्ती पात्र असतं. अर्थात असं असलं तरी गौरीच्या नायिका कधीच शामळू, नेभळट दिसल्या नाहीत. साध्या असल्या तरी त्या 'क्लासी' वाटत राहील्या. गौरीचा एकुलता कथासंग्रह म्हणजे 'आहे हे असं आहे'. चोवीस कथांच्या या कथासंग्रहात असणाऱ्या कथा स्त्री, किर्लोस्कर, सत्यकथा, आयुध, कवडसे इत्यादी मासिकांमधून पूर्वप्रसिद्ध झाल्या होत्या. या संग्रहातली मध्यमवयीन स्त्रीची कौटुंबिक भाषा जशी असावी तशीच आहे. स्त्री म्हणून जगत असताना एक व्यक्ती म्हणून आणि एक स्त्री म्हणून अशा भूमिका पार पाडत असताना तिला आलेले भिन्नविभिन्न अनुभवांचा संचय म्हणजे या चोवीस कथा आहेत. यातील बहुतांश कथांच्या नायिका हेच त्या त्या कथांचं प्रमुख पात्र म्हणून समोर येतात. कथेच्या त्या निवेदिका असतात. सुशिक्षित, आत्मविशास-आत्मभान असणाऱ्या त्या असतात. आपल्या मातृभाषेशिवाय इतर भाषांवर प्रभूत्व असणाऱ्या, जीवनात येत असणारी निरनिराळी अपयशं, केलेला संघर्ष, आलेल्या अडचणी या सर्व गोष्टी सहजीच पेलून नेणाऱ्या त्या असतात. न खचणाऱ्या, न डगमगणाऱ्या, आणा यशस्वी होणाऱ्या अशा त्या असतात. एकाअर्थी स्वतंत्र आणि बुद्धिवादी स्त्रियांची व्यक्तीचित्रे म्हणून हा कथासंग्रह विशेष आहे असं म्हणता येईल. विंचुर्णीचे धडे हे गौरीचं एकभेवं ललितलेखांचं पुस्तक आहे. ललित लेखसंग्रह असला तरीही गौरीच्या वास्तवावरच ते लेख आधारित आहेत.

ज्याप्रमाणे गौरीने मराठी आणि इंग्रजी साहित्यात लिखाण केले त्याचप्रमाणे अनुवादाच्या क्षेत्रातही स्वतःचा विशेष असा ठसा तिने उमटवला आहेच. रिचर्ड बर्टन यांच्या 'अरेबियन नाईट्स' चा गौरी देशपांडेनी केलेला मराठी अनुवाद हा अनुवादाचा उत्कृष्ट नमुना आहे. सोळा खंडांत असणारं हे अरेबियन नाईट्स विशेष ठरण्याची काही ठळक कारणं आहेत त्यातलं एक म्हणजे अनुवाद करताना कुठेही काटछाट करून किंवा लैंगिक संदर्भ आले आहेत म्हणून ते वगळून पुढे जाणं तिनं आवर्जून टाळलं आहे. या अनुवादात केवळ मूळमजकुराचाच अनुवाद केला नसून मूळ लिखाणात ज्या तळटीपा आहेत त्यांचाही व्यवस्थित अनुवाद केलेला दिसतो. अनुवाद वाचताना हा अनुवाद नसून याच भाषेत मूळ लिखाण केलं गेलं आहे असं वाटणं हे त्या अनुवादाचं यश आहे असं मला वाटतं. गौरीने केलेल्या अरेबियन नाईट्सच्या अनुवादाबाबतही असंच वाटतं. ते इतकं परीपूर्ण वाटतं की मूळ लेखनात जे काही कथानक आहे त्याचा पुरेपूर अर्क-त्यातलं मर्म जसच्या तसं त्यात आलेलं आहे. अरेबियन नाईट्स खेरीज गौरीनं 'सात युगोस्लाव कथा', 'मेहमूद रहिमतुल्ला',यांचाही इंग्रजीतून मराठीमध्ये अनुवाद केला. याचबरोबर गौरीनं मराठीतून काही उत्तम साहित्यकृती इंग्रजी भाषेत अनुवादीत केल्या. गौरीने, जयवंत दळवी यांची 'चक्र' ही कादंबरी, सुनिता देशपांडे यांचं 'आहे मनोहर तरी' आणि शंकरराव खरातांचं 'तराळ अंतराळ' ही आत्मकथनं, अविनाश धर्माधिकारी यांचं 'अस्वस्थ शतकाची डायरी', विद्याधर पुंडलिक यांचं 'माता द्रौपदी' आणि सतिश आळेकर यांचं 'महानिर्वाण' ही नाटकं, आणि सुमित्रा भावे यांनी संपादित केलेल्या 'तवा चुल्यावर' ह्या कामगार स्त्रीयांच्या मुलाखतीच्या पुस्तकांचा अनुवाद मराठीतून इंग्रजीत केला आहे.

माणसाच्या भावनिक आणि वैचारीक दोन्ही बाजूंची गुंफण करून ते लिलया आपल्या लिखाणातून मांडणं यात गौरीचा हातखंडा होता. आणि कदाचित म्हणूनच अनेक लोकांना गौरी देशपांडेच्या कादंबऱ्या या भावनाप्रधान वगैरे वाटून त्यात न रमणं किंवा रमणं आवडत असावं. पण गौरी म्हणजे फक्त भावनाप्रधान लिखाण असं नाही. गौरीच्या लेखनशैलीचा विचार केल्यास हे लक्षात येऊ शकतं. गौरी देशपांडेचं साहित्यातून स्त्रियांच्या भावनेला स्पष्टपणे जागा मिळाली असलीते म्हणजे फक्त स्त्री-पुरुषांची विविद नाती, नात्यातली सुंदरता, किंवा चितारलेली सुंदर चित्रणं नव्हेत तर स्त्रीयांनी आणि पुरुषांनीही आपापल्या आयुष्यात कसे असले पाहीजे, त्यांची काही तत्व असली पाहीजेत हेही दिसून येतं. साहित्यात म्हणजेच लिखाण करत असताना रोजच्या बोलीभाषेला चकचकीत करून, मुलामा चढवून तिचा अस्सलपणा जाऊन ती बऱ्याचदा मांडली जाते. त्यामुळं बऱ्याचदा ती भाषा किंवा ते कथन कुणी बाई करतेय की कुणी बाप्या करतोय हे लक्षात येत नाही. गौरीची भाषा ही स्त्रीची भाषा आहे. म्हणी उखाणे वाक्प्रचार यांच्या वापरामुळं आलेली एक लय आहे गौरीच्या भाषेला. ही लयदार भाषा कधी रडवते, कधी भावनिक करते, कधी स्त्रीच्या हृदयीचं शल्य दाखवतेस कधी तिचा निग्रह दाखवते. वर म्हणल्याप्रमाणं गौरीच्या साहित्यातली प्रमुख व्यक्तीरेखा ही स्त्रीच असते, एक दुःखी पण हुशार स्त्री, जी नंतर आपल्या जीवनाबद्दल व्यापक आणि फलदायी असे विचार करते. यामुळंच गौरीच्या कथात्म साहित्यात स्त्रीची भाषा आहे. गौरीच्या लिखाणात इंग्रजी शब्द, वाक्य किंवा काही काही संभाषणं ही इंग्रजीतूनच घडलेली दिसतात. याला कारण कदाचित इंग्रजीवरील तिचं प्रभूत्व आणि त्या भाषेतूनही व्यक्त होण्याइतकं त्या भाषेचं तिला असणारं ज्ञान, अफाट असं इंग्रजी वाचन हेही आहेच. तेरुओमधली नायिका आपल्या भावना तेरुओपर्यंत पोहोचवण्यासाठी इंग्रजी काव्याचा आधार घेते हे याचं एक उदाहरण आहे.

नाटकात ज्याप्रमाणे नेपत्थ्याचा वापर वातावरणनिर्मितीसाठी केला जातो त्याचप्रमाणे कथात्म साहित्यात कथेचा आशय समजावा म्हणून वातावरणनिर्मिती केली जाते. परंतू गौरीच्या साहित्यात या गोष्टीला स्थान नाही. तिच्या पात्रांचे उगाच तपशील ती देत बसत नाही. ती सरळ कथेलाच हात घालते. बऱ्याच लेखकांप्रमाणे विषयावर पकड येइपर्यंत त्या कथेतल्या पात्रांचा परिचय, त्यांचे शैक्षणिक-राजकीय-आर्थिक आलेख रचत बसत नाही. त्याची गौरीला गरज वाटत नाही. आपल्या लिखाणाबद्दल गौरी म्हणते "माझ्या वाचकांनी माझी पात्रं समजून घ्यावीत, त्यांना समजावून सांगायचं माझं कर्तव्य नाही.ज्या स्त्रीयांबद्दल मी लिहलं त्यांच्या भूतकाळाचा धांडोळा मी कधीही घेतला नाही. त्या आज जशा आहेत तशा त्या का बनल्या यासाठी त्यांच्या पूर्वायुष्याची मी तपासणी केली नाही, माझ्या सर्व नायिकांच्या कथा विशीच्या आसपास सुरु होतात. त्या आधीच्या आयुष्यात काय घडले हे मी लिहित नाही." त्यामुळे काथा-कादंबरीतील आशयाच्या निमित्ताने स्थळ-काळाचे वर्णन याव्यतिरिक्त फारसे 'बिनकामाचे' वर्णन तिच्या लिखाणात येत नाही आणि म्हणूनच गौरी वाचताने कंटाळा येत नाही. गौरीची भाषा flowery नाही. खूप जास्त अलंकारीक नाही. जे जे जसंजसं मनात येत गेलं तसंतसं तिने लिहिलं असावं असंच वाटतं. त्यामुळे, कथा जरी असल्या तरी त्या ओढून ताणून बनवलेल्या कथा वाटत नाहीत. आणि म्हणूनच त्या खऱ्या वाटतात, पुन्हापुन्हा वाचाव्याशा वाटतात.

अनेकवेळा अगदी साध्या पद्धतिने ती असं काही सांगून जाते की आपल्याला त्यावर विचार करण्याची वेळ येऊन पडते याचं उदाहरण द्यायचं तर 'कारावासातून पत्रे' मध्ये गौरी एकेठिकाणी म्हणते, "हे बघ, दुःख ही अगदी लाचार आणि निरुपयोगी गोष्ट आहे. त्याला प्रतिष्ठा केवळ आपण त्याला तोंड कसं देतो, सहन कसं करतो, त्यावरुन येणार. नुसतं आपलं, चला, एक वर्षं दुःख भोगून बघू कसं वाटतं ते, मग पुन्हा परत चावी फिरवून सुखाकडे तोंड केलं, असं का आयुष्य असतं? त्या दुःखानं आपण, आपलं आयुष्य, आपलं आपल्या आयुष्याशी नातं या सगळ्यांत बदल झाला नाही तर मग एकामागून एक जाणारे दिवस घालवण्याचा एक दुसरा मार्ग यापलिकडे त्याला काय अर्थ राहिला? दर दोन वर्षांनी जैसे थे ला यायचं म्हणजे आत्मज्ञानाची बात सोडाच पण प्रगतीची गतीही शून्यच." दुःख वाट्याला आलं तर त्याचं तुम्ही काय करता यावर तुमचं पुढचं आयुष्य बेतलेलं असतं हे गौरी सांगते.

गौरी तिच्या काळाच्या पुढची लेखिका आहे असं म्हणतात. तशी ती होतीच हे आपल्याला गौरी वाचल्यावर समजूनही जातं.

गौरीच्या कुठल्याही कथेचं मध्यवर्ती पात्र जरी वर म्हण्टलं तशी साधीशीच बाई असली तरी गौरीने अगदी सहजच सर्व क्षेत्रात वावर केलाय असं वाटतं. म्हणजे असं की वनमाळीचं काॅर्पोरेट आयुष्य आणि हरीभाईंचं काॅलेजमधलं साधंच शिक्षकी वागणं, त्यानंतर गावी शेतातला त्यांचा वावर, त्यातही सखूबाई, काळू. जपान मधल्या टोकियो, क्योतो वगैरे ठिकाणांची वर्णनं, तेरुओच्या दिसण्यापासून ते तिथल्या होणाऱ्या साकुरा फेस्टिवल्स, तिथल्या मंदिरांच वर्णन, तिथल्या माणसांचं रहाणीमान. तिथं होणारे ऋतूबदल आणि त्याचा बाहेरून तिथे गेलेल्या लोकांवर होत असणारा परिणाम. आयरीश इयन, स्काॅटीश अॅलिस्टर, ग्रीक दिमित्री, आंगेलिका, ग्रीकदेशातली वर्णनं, तळेगावचं आश्रम, तिचं काॅटेज, मुंबई, कांचन, वृद्ध नाना, तिने केलेल्या तंतोतंत वर्णनामुळे गौरी खरोखरंच या सर्वठीकाणी जगली आहे असं वाटतं. निरनिराळे लेखक, निरनिराळं संगीत, भिन्नभिन्न प्रांत, देश या सगळ्याचा दांडगा अनुभव आणि निसर्गातही रमण्याची आवड विंचुर्णीत दिसून येते.

गौरीची भाषा सोपी आहे. आणि बहुतेक म्हणूनच ती जरा समजायला अवघड जाते अनेकांना.

वर म्हण्टलं तसं गौरी तिच्या काळाच्या पुढची लेखिका होती. आणि त्यामधे असणारे विवाहबाह्यसंबंध मग ते मैत्रीचे, प्रेमाचे कसेही असो, पण ते आपण वाचत आहोत हे सांगणंही आपल्या समाजात अनेकजणांना नको वाटतं म्हणून गौरीच्या कादंबऱ्या वाचतो हे सांगताना काहीजण आजही चाचरतात. गौरीच्या "नायिका" स्वतःच्या आनंदाचा विचार करतात. आणि केवळ म्हणूनही गौरीच्या लिखाणाला विरोध किंवा ते कसं चांगलं नाही असं सांगणारेही अनेक लोक आज आहेत.
गौरीच्या नायिकांना मनात खोलवर बोचणारी एकप्रकारची अतृप्तता असते तृप्तीची तहान वाढवणारी अतृप्तता वगैरे असं काहीसं क्लिशेड् बोलता येईल याबाबतीत. तिच्या आयुष्यात आर्थिक प्रश्न असले, तरी ते टोकाचे नसतात. वरवर पाहताना सुस्थितीतील असणारी ती अस्वस्थ मात्र असते. तिच्या संवेदनाशील मनाला काहीतरी टोचत असत, काहीतरी सलत असतं. ते नक्की काय, हा प्रश्न आपल्याला फार त्रास देतो. कधी ती नात्यातला खरा अर्थ शोधत असते, तर कधी स्वतःच्या अस्तित्वाचा.खूप हुशार असूनही गौरीची नायिका जगाच्या, व्यवहाराच्या पातळीवर यशस्वी नसते. तिला स्वतःच असं खास अस्तित्व नक्की असतं. आणि यावरच फिदा असणारे पुरुष तिच्या अवतींभोवती असतात. पण तिला मात्र वेगळ्याच कशाचीतरी जीवघेणी आस असते. त्या उत्तराच्या मागे कितीतरी वेळा गौरीची नायिका नायकाचे अस्तित्व, त्याचा सहवास नाकारते. गौरीच्या नायिका दिसायला सर्वसामान्य, कधी काळ्यासावळ्या, सुरकुतलेल्या, स्वतःच्या रुपाची फारशी काळजी किंवा पर्वा न करणाऱ्या असतात. मात्र त्या बुद्धिभान, आत्मविश्वासू असतात. त्या देखणेपणाच्या किंवा सुस्वरुप असण्याच्या जगन्मान्य चौकटीत बसत नसल्या तरी गौरीच्या नायकांना मात्र त्या देखण्या वाटत असतात ते या नायिकांच्या बुद्धि आणिआत्मविश्वासामुळं असेल असं वाटतं. आणि मग रुपा-रंगापेक्षाही एखाद्या बाईच्या ठायी असणाऱ्या बुद्धिकौशल्य, आणि इतर गुणांना वाखाणणाऱ्या या नायकांबद्दल आपसूकच एक विशेष कौतुक, कुतूहल वाटू लागतं. गौरीचे नायकही नायिकांइतकेच समजूतदार असतात. अगदी गुणी असतात. बायकोला किंवा मैत्रिणीला समजून घेणारे. गुणदोषासकट मनापासून केलेला स्वीकार आणि दोषांवर मात करायला नकळतपणे करत गेलेली मदत, नायिकेला तिच्या भीत्यांमधून मोकळं करणारे असे ते नायक आहेत. या साऱ्याबरोबरच ते मोकळ्या विचाराचे आहेत. आपल्या नायिकेचे काहीवेळा विचित्र वाटतील असे निर्णयही ते खूषीनं स्वीकारताना दिसतात. नायिकेवर फक्त प्रेमच करणारे किंवा पालकभावच असणारे हे नायक नसून नायिकेचा खऱ्या अर्थानं आदर करणारा सोबती असतात गौरीचे नायक. गौरीचे नायकांबद्दल 'आपल्यालाही असा एखादा मित्र असावा' असं बहुतेक साऱ्या मुलींना आणि 'आपणही असा मित्र बनलं पाहीजे' असं बहुतेक मुलांना गौरी वाचल्यानंतर किमान एकदातरी वाटून जातं.

गौरीची पात्रं स्वतंत्र संशोधनाचा विषय आहेत. तिची पात्रं, त्यांची भाषा, त्यांचे विचार, त्यांचं व्यक्त होणं, त्यांचं evolve होत जाणं, मानवी नातेसंबंधातील गुंतागुंत, आणि त्यात होणारे मनोव्यापार, सामाजिक बांधिलकी आणि स्वतःसाठी असणारी स्वतःची कर्तव्य आणिकही खूप काही. या सर्वांवर प्रबंध लिहिता येऊ शकतो. पण थोडक्यात सांगायचं तर गौरीची पात्रं जिवंत वाटतात त्यामुळे गौरी वाचत असताना कधीही आपण एकटेच आहोत असं वाटत नसतं. ती पात्रं डोळ्यांसमोर येत राहतात, ती स्वतःच तुमच्याशी बोलू लागतात. दिमित्री, तेरुओ, इयन, वनमाळी, अॅलिस्टर, नंदन, जनक, माधव, फारुख, जसू, आनंद, कालिंदी, नमू, जी, ती, वसू, शमी, मिमी... हे सर्वजण त्यांच्या आयुष्याबद्दल तुमच्याशी बोलतात असंच वाटतं. कुठलीही एक व्यक्ती दुसरीसारखी नाही.

गौरीच्या कथांमधून प्रेम कळत जातं, मैत्र समजत जातं. आपणही आपल्याच नकळत आपल्यावर प्रेम करायला लागतो किंवा आपल्या स्वतःसाठी जगायला लागतो कालिंदीसारखं. आणि मला वाटतं हेच महत्त्वाचं आहे.

स्त्रीनं स्वतःबद्दल विचार केला पाहीजे हे गौरीच्या कथा सांगतात. महर्षी ते गौरीमधे गौरी एका मुलाखतीत म्हणते, "स्त्री स्वातंत्र्य, स्त्रीमुक्ती हा जगण्याकडे बघण्याचा दृष्टीकोन आहे, ही काही पाकक्रिया नाही. प्रत्येक बाईला स्वतःच्या बाबतीत गोष्टी ठरवण्याची मुभा असली पाहीजे. मुक्ती म्हणजे काय हवं आणि काय नको हे ठरवता येणं." गौरीच्या नायिका अश्या आहेत, आणि त्या वाचताना आपणही आपणाला आपलं स्वातंत्र्य मिळवता आलं पाहीजे याचा विचार करतो, हे या लेखिकेचं श्रेय आहे असं वाटतं.

(समदा दिवाळी २०१८ मध्ये प्रकाशित)

Address

H-14/403, Aahana, Press Enclave, Pratiksha Nagar, Sion
Mumbai
400022

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when TheOped posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share